सेतू कार्यालयाचा कारभार सुधारा – विशाल सुर्यवंशी
राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने वाळवा तालुक्याचे तहसीलदार मा.प्रदीप उबाळे साहेब यांना सेतू कार्यालयाचा कारभार सुधारणे संदर्भात निवेदन देण्यात आले.
सध्या बारावी व इतर शाळांचे निकाल लागल्यामुळे निकाल लागल्यामुळे सर्वत्र ॲडमिशनसाठी लागणारे दाखले काढण्याची गडबड पालक व विद्यार्थ्यांची सुरू आहे.बऱ्याच लोकांनी सुट्टीच्या कालावधीमध्ये ही दाखले काढून घेतले आहेत. परंतु तहसील कार्यालयामधील सेतूमध्ये फार मोठा गलथान कारभार सुरू असल्याचे निदर्शनास येते.नागरिकांना वेळेमध्ये कोणते दाखले मिळत नाहीत.बऱ्याच वेळा तांत्रिक अडचणी सांगून लोकांना हेलपाटे मारण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच तेथील कर्मचारी वर्ग हा बऱ्याचदा उपस्थिती नसतो. कधीकधी सर्व्हरचा प्रॉब्लेम तर मध्यंतरी प्रिंटरच्या प्रॉब्लेममुळे तीन दिवस लोक हेलपाटे मारत होते.जातीच्या दाखल्यासाठी अर्ज दिले पासून 45 दिवसांच्या आत नियमानुसार दाखला तयार होऊन देणे बंधनकारक आहे.परंतु अर्ज केल्यापासून दोन महिन्यानंतर अर्जाची छाननी करून दाखले दिले गेले.तसेच दाखल्यासाठी लागणारी फी ही अतिरिक्त घेतली जाते.या कार्यालयमध्ये गेले कित्येक दिवसांपासून झेरॉक्स मशीनही बंद असल्याने लोकांना झेरॉक्स साठी बाहेर फेऱ्या माराव्या लागतात.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.जयंतराव पाटील साहेबांनी विशेष प्रयत्न करून तहसील कार्यालयाची सुसज्ज व सुंदर इमारत बनवलेली आहे.परंतु सेतू कार्यालयामध्ये साधी स्वच्छता करण्याची तसदीही हे लोक घेत नाहीत. तसेच बऱ्याच महा-ई-सेवा केंद्रामध्ये जातीचे दाखल्यांसाठी भरमसाठ पैसे घेतले जातात व तेही दाखले वेळेत मिळत नाहीत.
सध्या विद्यार्थी व पालकांची दाखले काढण्याची गडबड चालू आहे.सदर दाखले वेळेत व सुरळीतपणे देण्याची यंत्रणा येत्या आठ दिवसांमध्ये व्हावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सरचिटणीस विशाल सूर्यवंशी यांनी दिला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण डबाणे,जिल्हा सदस्य संतोष चव्हाण,बूथ अध्यक्ष गंगाराम शिंगाडे,सूर्याजी पाटील सौरभ जाधव,मिलिंद पाटील अवधूत सूर्यवंशी,रवींद्र खरात, रमेश जावळे, विक्रांत ताटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.