घरोघरी शाळा’ उपक्रम राबवणारे शिक्षक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित
सातवीतील विद्यार्थी ठरला राष्ट्रीय बालतंत्रस्नेही गौरव पुरस्काराचा मानकरी.
कोरोना संकटकाळातही ‘घरोघरी शाळा’ उपक्रम प्रभाविपणे राबवून शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवण्याचे कार्य राज्यातील अनेक शिक्षकांनी केले. त्यापैकी काही शिक्षकांना वैजापूर येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सुरजलाल येलमुले, पुणे जिल्ह्यातील मनिषा शिंदे, औरंगाबाद जिल्ह्यातील
शर्मिला विधाटे, अहमदनगरमधील मनिषा कदम व संगिता बोराटे, नेवासा तालुक्यातील सुनिता निकम व सातारा जिल्ह्यातील घरोघरी शाळा उपक्रमाचे प्रणेते मा. संजय खरात यांचा समावेश आहे.
‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचा लोगो तयार करणारा इयत्ता सातवीमध्ये शिक्षणास असलेला चि. मानस कदम यासही छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय बालतंत्रस्नेही पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
जेव्हा कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्यामुळे सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरु होते. परंतु ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या विविध अडचणींमुळे शिक्षण सर्वत्र पोहचत नव्हते. म्हणून सातारा जिल्ह्यातील मा. संजय खरात यांनी जि.प. प्राथमिक शाळा वडगाव ता. माण जि. सातारा येथे ‘घरोघरी शाळा’उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करुन विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभाविपणे सुरु ठेवले.
सदर उपक्रमाची माहिती घेवून राज्याच्या विविध भागातील शिक्षकांनीही स्वखर्चातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून ‘घरोघरी शाळा’ या अभिनव उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभाविपणे सुरु ठेवले. त्यांच्या या कार्याची दखल घेवून औरंगाबाद जिल्ह्यातील जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सदर शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.