छत्रपती शिवरायांचा कार्यातून प्रेरणा घेऊन लोकशाहीचे बळकटीकरण करावे -प्राचार्य डॉक्टर अंकुश बेलवटकर
इस्लामपूर : “स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी शोषण, गुलामगिरी व दडपणुकीच्या काळात स्वराज्य निर्माण करून शेतकरी व जनसामान्यांना सुखी केले;त्यांना न्याय दिला. राजेशाही, मुघलशाही व सरंजामशाहीच्या कालखंडात धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य व समानतेची मूल्य रुजवली.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर अंकुश बेलवटकर यांनी केले.
ते येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूरच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित व अग्रणी महाविद्यालय प्रायोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवामध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले,”छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेला वारसा व आदर्श मूल्यातून लोकशाही व संविधानाचे बळकटीकरण व्हावे. शिवरायांच्या इतिहासाचा कोणी गैरवापर करून समाज व्यवस्थेचे सरंजामीकरण करू नये. छत्रपती शिवरायांना मानवी मूल्यांची हितजपणूक करणाऱ्या भक्ती संप्रदायाचा वारसा मिळाला. त्यामुळेच शिवरायांनी शेतकरी, स्त्रिया, वंचित व पीडित जनसामान्यांच्या हिताची जपणूक केली. त्यांच्या स्वराज्यात हिंदू-मुस्लिम गुण्या-गोविंदाने नांदत होते.”
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संयोजन प्रा. डॉ. राम घुले यांनी केले. सुरुवातीला कु. श्रद्धा बल्लाळ या विद्यार्थिनीने शिवरायांच्यावर पोवाडा सादर केला. कु. रजिया मुलाणी यांनी शिवाजी राजांचा पाळणा सादर केला.सौ.प्रितल मजुकर, कु. गायत्री कोमटे, कु. सुकन्या पाटील कु. मृणाली मोहिते कु. सीमा बावडे यांनी याप्रसंगी विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या जीवन-प्रसंगावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ. मेघा संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास 85 विद्यार्थिनी व प्रा. डॉ. वर्षा पाटील, प्रा. डॉ. वृषाली पाटील, प्रा. डॉ. मेघा पाटील, प्रा. डॉ. शिला रत्नाकर प्रा. डॉ. स्नेहल हेगिष्टे प्रा. डॉ. संजीवनी पाटील व प्रा.श्रीकांत जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण सर यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. राम घुले यांनी केले.