गुहागरच्या सुनेची दुसऱ्यांदा पायी नर्मदा परिक्रमा
विलक्षण अनुभव, प्रचंड संघर्ष करत 3700 किमी.चा 105 दिवसांचा अथक प्रवास
सांसारिक सुख, सोयी सुविधांचा त्याग करून व
संन्यासिनी व्रत धारण करून नर्मदा मैय्याची कृपा व स्वामी समर्थ महाराजांचा आर्शिवाद यांच्या जोरावर पुन्हा दुसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा
यात्रा करण्याचे साहस गुहागर तालुक्यातील अडूर येथील सौ. रश्मी महेश विचारे यांनी केला आहे. विचारे यांनी 1 नोव्हेंबरला परिक्रमेला प्रारंभ
केला होता. विलक्षण अनुभव घेत आणि प्रचंड संघर्ष करत तिने हा 3700 कि..मीचा आणि 105 दिवसांचा अथक प्रवास पूर्ण केला. नर्मदा माईने माझ्याकडून दुसरी परिक्रमाही पूर्ण करुन घेतल्याची भावपूर्ण प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नर्मदा परिक्रमा ही पुरातन अध्यात्मिक प्रथा आहे. देवत्व लाभलेल्या गंगेसारख्या नद्या असताना एकट्या नर्मदेची परिक्रमा केली जाते. प्राचीन
आणि पुण्यशील नदी म्हणून नर्मदेला भारतवर्षात खूप महत्व आहे. जीवनात एकदा तरी तिची परिक्रमा करण्याची इच्छा कित्येकांना असते. परंतु अनेक गैरसमज,एकट्याने कसे जमेल अशी भीती, धाकधूक असते. हे गैरसमज दूर होण्यासाठी, भीती कमी करण्यासाठी सौ.रश्मी विचारे यांनी एकटीने पायी चालत केलेल्या या नर्मदा परीक्रमेच्या वारीने एक वेगळी अनुभूती सर्वासमोर उभी राहिली आहे.
नर्मदा परिक्रमा म्हणजे नेमकं काय व कमी वयात परिक्रमेला जाण्याचा विचार मनात का आणि कसा आला हे सांगताना सौ. विचारे यांनी जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदा परिक्रमेवरील पुस्तक वाचल्यानंतर मनात आलेला विचार तडीस नेईपर्यंत काय काय योजना आखल्या, मुलगा, पती, कुटुंबातील इतर प्रियजनाना सोडून चार महिने एकटीने खडतर प्रवासासाठी निघेपर्यंतचा काळ डोळ्यांपुढे उभे करताना
आठवणींनी त्या काही क्षण हळव्या झाल्याचे सांगतात.
या परिक्रमेत भेटलेले परिक्रमावासीय, आश्रमवासीय,
स्नेह-प्रेम-काळजी-आदरभाव-उदारता या मनाच्या श्रीमंतीने काठोकाठ भरलेले नर्मदेच्या काठावरील सेवाभावी लोक, अडचणीच्या वेळी कोणाच्याही रुपात
दर्शन देणारी नर्मदा मैया, अशा अनेक अनुभव व आठवणी गाठीशी बांधून सौ.विचारे यांनी सलग दुसऱ्यांदा पूर्ण केलेली नर्मदा परिक्रमा कुतूहलाचा
विषय ठरली आहे. अनुभव वर्णन ऐकतांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय, ती कशीअसते, का करायची असते हे हळुहळू स्पष्ट होत होते. मैया आपल्याकडून
परिक्रमा कशी करून घेते, कशी परीक्षा घेते, लाडही करते. माया करते,सांभाळून घेते. नर्मदा ही जगातील एकमेव नदी, जीच्या उगम स्थळ अमरकंटक ते
संगम स्थळ भरूच पर्यंत दोन्ही किनाऱ्यांवर चालत परिक्रमा केली जाते.दरवर्षी लाखो साधू संत, महंत, संन्यासी, अध्यात्मिक गुरू, सांसारिक
व्यक्ती नर्मदा परिक्रमेवर चालत असतात.परिक्रमा तीन प्रकारे करता येते. वाहनाने, किनाऱ्यापासून काही अंतर ठेवून
रस्त्याने आणि अनवाणी पायी चालत नर्मदेच्या किनाऱ्याने. सर्वात महत्वाची
ती अनवाणी चालत परिक्रमा. यावेळी काही धार्मिक नियम पाळणे अनिवार्य आहे.
इथेच आपल्या मानसिक-शारीरिक क्षमतेचा कस लागतो. पूर्णपणे अनवाणी,
न्यूनतम सामान घेऊन चालायचे. नदी कुठेही ओलांडायची नाही. कोणत्याही
वस्तूंचा संग्रह जवळ ठेवायचा नाही. अहंभाव असता कामा नये. कसली आसक्ती
करायची नाही. कोणाकडे काही मागायचे नाही. कोणी स्वतःहून दिले तर
नाकारायचे नाही. सूर्योदयाला चालत निघायचे आणि सूर्यास्ताला थांबायचे.
रोज नर्मदाजल पूजेचा नित्यनेम ठेवायचा. परिक्रमेत असताना त्यांची
सहनशीलता, वेळोवेळी मिळणारे संकेत, खडतर अशा जंगलातील वाटेने वाऱ्याच्या
वेगाने चालणं, वाट हरवणं, अडचणींचे निवारण, स्त्रीसुलभ मासिकधर्म,
पोटातील भूक,शतब्बेत बिघडणं, निघायच्या आधीच सुरू झालेलं पायाचं दुखणं,
त्यावर केलेली मात, आणि शेवटी ध्येय गाठण्याच्या इच्छेची पूर्तता. सारं सारं काही अचंबित करणारं! नर्मदेचा परिसर, प्रदेश, गावे, आश्रम, जंगले इ.भौगोलिक माहिती अगदी तोंडपाठ झाल्याचे सौ. रश्मी विचारे यांनी सांगितले.