पुणे महापालिका पावसाळ्यापूर्वी ४६ जीर्ण वाडे पाडणार
पुणे महापालिकेने शहरातील ४६ जीर्ण वाडे पावसाळ्यापूर्वी पाडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाडे मोकळे करावेत अशी सूचना महापालिकेने तेथील रहिवाशांना केली आहे.
गणेश पेठ, गंज पेठ, सोमवार पेठ, कसबा पेठ, घोरपडे पेठ, मंगळवार पेठ आणि आजूबाजूच्या परिसरातील प्रमुख पेठ भागात असलेले हे वाडे धोकादायक स्थितीत आहेत. मागील वर्षी या वाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात हे वाडे अतिधोकादायक स्थितीत असल्याचे दिसून आले आहे.
या वाडे मोकळे करण्यात अनेक कायदेशीर अडचणींना महापालिकेला तोंड द्यावे लागते. यामध्ये बहुतेकदा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद, या वाड्यांमध्ये राहणार्या नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित होण्यासाठी येणार्या आर्थिक अडचणी हे त्यात अनेकदा महत्त्वाचे कारण ठरतात. हे टाळण्यासाठी महापालिकेने भाडेकरू प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. या प्रमाणपत्रांच्या वैधता आणि उपयोगितेविषयी भाडेकरूंच्या मनात संभ्रम आहे.त्यामुळे ही बांधकामे काढून टाकण्यात पालिकेला अडचणी येत आहेत.