भारतीय जनता पार्टीने देशात समान नागरी कायदा आणला तर तो भारतीय जनता पार्टीसच अहितकारक होईल* *महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. श्री. आण्णासाहेब डांगे
दिनांक ३० ऑक्टोंबर २०२२ रोजी टी.व्ही.च्या एका चॅनलवर स्वतःला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या गृहस्थानी “भारतीय जनता पार्टीने समान नागरी कायदा आणावा तो त्यांना फायद्याचा ठरेल” असे वक्तव्य केल्याचे पाहण्यात आले. घटनाकारांनी ज्या कारणामुळे समाजातील अनुसूचित जाती-जमाती व मागासांच्या विशेष प्रवर्गासाठी आरक्षण निर्माण केले होते, त्याचे मुख्य कारण आज ज्यांना ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळतोय त्या जाती-जमातींचे मागासलेपण लक्षात घेऊन त्यांना आरक्षण दिले होते. आज त्या जाती-जमातींच्या सामाजिक स्थितीकडे पाहिले तर त्या आरक्षणाचे फायदे घेऊन इतर प्रगत समाजाचे किंवा जाती-जमातींच्या बरोबरीचे जीवन जगत असल्याचे दिसत नाही. अपवादात्मक त्यांचे मधील पाच-दहा टक्के लोकांचे जीवनमान कदाचित सुधारले आहे असे म्हणता येईल. परंतु त्याच्यातील नव्वद टक्के समाज अजून अज्ञान, दारिद्रय यांचे चटके सोसतच आपले जीवन व्यथीत करत आहे.
ही वस्तुस्थिती नजरेआड करून भारतीय जनता पक्षाने समान नागरी कायदा करून मागास समाजाला आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित ठेवले तर सहाजिकच याची रिॲक्शन येऊन हा मागासलेला (आज आरक्षणाचे कवच असलेला) समाज भा.ज.पा. च्या विरोधात जाऊन त्याचे दुष्परिणाम सार्वत्रिक निवडणुकीत भा.ज.पा. ला भोगावे लागून पक्षाची पुन्हा सत्तेवर येण्याची संधी गमवावी लागेल हे उघडे-नागडे सत्य दृष्टीआड करून चालणार नाही.
महाराष्ट्रात मराठा समाज आज आरक्षण मागतोय. त्यांना ‘तुम्हास आरक्षण मिळणार नाही’ असे म्हणण्याची अथवा त्यापुढे जाऊन ‘मराठा समाज प्रगत आहे त्यास आम्ही आरक्षण देणार नाही’ असे भारतीय जनता पार्टीचा कोणी नेता अथवा राज्यकर्ते म्हणू शकत नाहीत. उलट मराठा समाजाला तात्पुरते का होईना बरे वाटण्यासाठी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्या संबंधित सकारात्मकपणाचा उसना आव आणून भा.ज.पा.चे राज्यकर्ते आपण आरक्षणाच्या बाजूने असल्याचा आव आणत आहेत ते का ?
अशा वातावरणात समान नागरी कायदा आणावा म्हणणे अथवा आणला गेला तर भा.ज.पा. ला पुन्हा सत्तेवर यायला किती वर्षे घालवावी लागतील याचा विचार सुज्ञानी करावा अशा आशयाचे प्रसिद्धपत्र महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.