ताज्या घडामोडी

मालती कन्या महाविद्यालयात गौरी गीत व नृत्य स्पर्धा उत्साहात”

Spread the love

इस्लामपूर दि. वार्ताहर

“लोकसंस्कृतीमधील सर्वात मोठा व उत्साहवर्धक सण हा गौरीचा आहे. गौरी गीते व गौरीचे खेळ हा आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून त्याद्वारे महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम जपले जाते. त्यामुळे नव्या युगातील नवतरुणींनी गौरी सणातील गीते व खेळ आत्मसात करावेत” असे आवाहन सौ ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी केले.
येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग आयोजित अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत गौरी गीतगायन, गौरी नृत्य व उखाणे स्पर्धांचे आयोजन केले होते. याप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी सौ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या,”भाद्रपदात शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते. तेव्हा त्या नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन करतात. हा उत्सव तीन दिवस चालतो. ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे. त्यामधील एक गौरी घरातच असते, तीच लक्ष्मी होय. एक गौरी बाहेरून आणली जाते, तीच ज्येष्ठागौरी होय. कुमारिका व सवाष्णी तीन दिवस गौरी गीते व गौरीचे खेळ खेळतात सर्व सुख दुःख विसरून आनंदाने सर्व सख्या एकत्र येऊन गौराईची उपासना करतात.”
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना प्रा. डॉ.राम घुले म्हणाले, “आर्यपूर्व, कृषीप्रधान, मातृसत्ताक परंपरेतील नवसृजनाचा कृषिमाया विधी म्हणून गौरी उपासना केली जात होती. सिंधू कृषिजन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करीत असत. भूमी आणि स्त्री यांच्यातील सहभावात्मक सुफलीकरणाचा हा विधी असतो. ज्येष्ठा अर्थात ‘अलक्ष्मी’ म्हणजेच ‘निऋत्ती’ मातृदेवता होय. शैवसंप्रदायाने पार्वतीच्या रूपात तिला पुजले तर काहींनी महालक्ष्मीच्या रूपात उपासले.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. वृषाली पाटील होत्या.सांस्कृतिक विभागाद्वारे गौरी नृत्य खेळ स्पर्धेमध्ये एकूण सहा संघ सहभागी झाले, तर गौरी गायनामध्ये दोन संघांनी सहभाग घेतला. उखाण्याच्या स्पर्धेत आठ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. गौरी नृत्य/खेळ स्पर्धेत प्रथम क्रमांक बी. कॉम. भाग- तीन, द्वितीय क्रमांक बी. कॉम. भाग दोन व तृतीय क्रमांक बी.ए. भाग दोनच्या विद्यार्थिनी पटकाविला. गौरी गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक बी कॉम भाग तीन व द्वितीय क्रमांक कु.तेजश्री बल्लाळ व ग्रुपने पटकाविला. उखाण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.गायत्री गोमटे, द्वितीय क्रमांक कु.मानसी शेळके, तृतीय क्रमांक कु.वसुधा माने यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण सौ. ज्योत्स्ना कुलकर्णी, प्रा. डॉ.शीला रत्नाकर, प्रा.डाॅ.संजीवनी पाटील, प्रा.डाॅ.वृषाली पाटील, प्रा. वर्षा पाटील, व प्रा. अमृता निलाखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत जाधव कु.वैभवी पाटील व कु.साक्षी चाळके यांनी केले.
कार्यक्रमास प्रा.डॉ. स्नेहल हेगिष्टे व प्रा. के. बी. पाटील व इतर शिक्षक हजर होते. कार्यक्रमाचे आभार प्रा वर्षा पाटील यांनी केले. कार्यक्रमास एकूण 150 विद्यार्थिनी हजर होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!