आपत्कालीन संपर्काचे प्रभावी माध्यम म्हणजे ग्रामसुरक्षा यंत्रणा….डी. के. गोर्डे
मुरूम ता. उमरगा, ता. ७ (प्रतिनिधी)
आपत्कालीन संकट काळात ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क केल्यास एकाच वेळी हजारो नागरिकांशी संपर्क साधता येतो. त्यामुळे एखादी होणारी घटना अथवा प्रसंग व त्याचे होणारे दुष्परिणाम आपणाला ताबडतोब टाळता येऊ शकतात. या यंत्रणेच्या माध्यमातून आपत्कालीन संकट शंभर टक्के रोखता येत असल्याने आपत्कालीन संपर्काचे प्रभावी माध्यम म्हणजे ग्रामसुरक्षा यंत्रणा होय.
असे प्रतिपादन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी केले. उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून शुक्रवारी ( ता. ७) रोजी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सपोनि अशोक माळी होते. यावेळी सपोनि रंगनाथ जगताप होते. पुढे बोलताना गोर्डे म्हणाले की, आपल्या पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यरत होणार असल्याने चोरी-दरोडे, महिलांसंदर्भातील गुन्हे, लहान मुले हरविणे, वाहन चोरी, गंभीर अपघात, वन्यप्राण्यांचा हल्ला, आग आदींच्या घटना ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे तातडीने मार्गी लावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा संकटाच्या वेळी प्रभावी वापर करावा आणि पोलिस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन शेवटी डी. के. गोर्डे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रंगनाथ जगताप यांनी केले. अध्यक्ष समारोप प्रसंगी अशोक माळी यांनी या यंत्रणेसाठी परिसरातील ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच व विविध संस्था पदाधिकारी व नागरिकांनी या यंत्रणेचा पुरेपूर वापर करून व सहभागी होऊन एखादया घटनेच्या माध्यमातून होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यावेळी सौरभ घुले, अमर महानुरे, श्रीराम सोनटक्के, अमर जाधव यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गायकवाड तर आभार संदिपान कोळी यांनी मानले.