विद्यार्थ्यांच्या ध्येयपूर्तीसाठी अध्यापकांनी आंतरिक प्रेरणेने अध्यापन करणे गरजेचे- चेअरमन बंधू मयेकर यांचे प्रतिपादन
जाकादेवी/वार्ताहर- शिक्षकांनी शालेय वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यप्रवण असले पाहिजे, एवढेच नव्हे तर वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता प्राप्तीसाठी आजच्या अध्यापकांनी विशेष लक्ष वेधून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यची नितांत गरज आहे. ध्येयपूर्तीसाठी आंतरिक तळमळीने शालेय कामकाज प्रामाणिकपणे पार पाडल्यास अशा शिक्षकांची समाजात चांगली प्रतिमा तयार होते, अशा शिक्षकांना समाजात मानाचे स्थान प्राप्त होते, म्हणून आजच्या अध्यापकांनी दिलेल्या उदिष्टानुसार आपली शैक्षणिक कामगिरी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी केले.
जाकादेवी येथे आयोजित शिक्षक, प्राध्यापक सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाचे सावट संपुष्टात आले आहे .आता उपलब्ध शालेय वेळेत माझ्या शिक्षण संस्थेच्या शाळांतील सर्व शिक्षकांनी अतिशय निष्ठेने निश्चित ध्येय समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यप्रवण व्हावे, अभ्यासाबाबत पालकांशी सुसंवाद ठेवावा, शालेय शैक्षणिक गरजा संस्थेकडून चांगल्याप्रकारे पुरविल्या जात आहेत.अपेक्षित गरजा लकरच पुर्णत्वास नेऊ असेही ते बोलले. अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांविषयी चेअरमन बंधू मयेकर यांनी गौरवोद्गार काढले.यावेळी बंधू मयेकर यांनी शैक्षणिक धोरणाबाबत उपस्थित शिक्षकांना अतिशय बहुमोल मार्गदर्शन करून त्यांनी आपले अनुभवही कथन केले.
या सभेला संस्थेचे सक्रिय सचिव व शालेय प्रशासनाचे अभ्यासक विनायक राऊत ,जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, निमंत्रित संचालक श्रीकांत मेहेंदळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, जेष्ठ शिक्षक भूपाल शेंडगे सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.स्वागत मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी केले तर आभार भूपाल शेंडगे यांनी मानले.