न्यायाधीश बिपिन चंद्रजी राठी__ दैव जाणिले कुणी.. भाग २ ..
न्यायाधीश बिपिन चंद्रजी राठी__ दैव जाणिले कुणी..
भाग २ .Judge Bipin Chandraji Rathi__ Who knew the fortune..
आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर विशेष लेख १२ एप्रिल.
गेली तीस-पस्तीस वर्षे उत्तम प्रकारे जपलेली माझी व माझ्या घराण्याची सामाजिक प्रतिष्ठा एका दिवसातच संपली….
पण असहाय्यपणे पाहण्या पलिकडे मी काहीच करू शकत नव्हतो.
मीच कोलमडलं तर माझ्या मुलाला ,मुलीला व पत्नीला सर्व कुटुंबाला आधार कोण देणार?
म्हणून प्रयत्नपूर्वक मी स्वतः सावरलं आणि भक्कम पणे माझ्या मुलाच्या पाठीशी मी उभा राहिलो ,कारण गेली अनेक वर्ष न्यायदानाचे काम केल्यामुळे माझा मुलगा या घटनेत पूर्णपणे निर्दोषी आहे याची मला खात्री होती .
डॉक्टर साहेब काळ कोणासाठी थांबत नाही.
दोन महिन्यातच सत्य बाहेर पडलं ,कायदेशीररित्या या घटनेकडे पोलिसांनी व न्यायालयाने बघितल्यानंतर वस्तुस्थिती त्यांना समजली.
त्याबरोबर आम्ही सुद्धा या धक्क्यातून मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सावरलो आणि औरंगाबादला मी निवृत्तीनंतर कायद्याचा सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू केला ….
पण अजून माझ्या मागील दुष्टचक्र थांबलं नव्हतं ,याची प्रचिती मला लवकरच आली.
रस्ता ओलांडताना एक निमित्त होऊन माझ्या मुलाचं अकाली अपघाती निधन झालं.
त्याचा व आमचा जराही दोष नसताना नियतीने हा प्रचंड आघात आमच्यावर केला .
तो सहन करण्याची क्षमता, मी तर राहोच.
पण कोणालाही सामान्य व्यक्तीला सहन करण्याच्या पलीकडे होती .
ती ही मनाचा कुठलाही बांध न फूटू देता .
मी गेले 24तास स्वतःला स्थिर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण मनात साचलेलं वादळ अशा उद्रेक होऊन बाहेर पडलं .
डॉक्टर साहेब समाजातील माझी प्रतिमा पूर्ण डागाळलेली आहे .
एकुलता एक मुलाच अचानक निधन व ज्याच्यावर माझी मदार होती …..
त्याच्या जाण्याच्या दुःखा नंतर मी का कशासाठी जगू?
हा यक्षप्रश्न तुम्हीच सांगा मी कसा सोडवू ?
मित्रांनो मन विदीर्ण करणारी घटना ऐकल्यावर राठी साहेबांचं सातवं कसं करावं यासाठी मी शब्द चाचपडत होतो .
त्यांचा आधार घेत होतो.
शेवटी आशेचा एक दिवा मला दिसला …..
माझ्या संपर्कात आलेल्या अनेक कुटुंबांमध्ये अशा मन हेलावून टाकलेल्या घटना घडलेल्या होत्या .
मला माहीत असलेले श्री शरद जोशी त्यांच्या एकुलता एक मुलगा अशाच शेगावच्या प्रवासात अपघाती दुःखद निधन झालं होतं.
ते ही असेच मनाने खचलेे होते पण थोडा काळ गेल्यानंतर सावरले ,व त्याने “श्रीरंग कलानिकेतन ”
या संस्थेची स्थापना केली .
त्या गोष्टीला वीस वर्ष झालेली आहे.
या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कलेची उपासना केली, अनेक कलाकार तयार केले, आणि समाजाचं ऋण एक वेगळ्या प्रकारे उत्तम कलाकार निर्मितीच्या माध्यमातून फेडलं.
या कृतीतून त्यांना जीवन जगण्यासाठी एक अर्थ प्राप्त झाला .
आजही त्यांच्याकडे पाहिले की जीवन सार्थकी लागल्याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसते.
राठी साहेबांना असाच सल्ला देण्याचे मी ठरवलं .
त्यांनीही आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर मुक्त कायदा सल्ला केंद्र उभारून मुलाच्या नावाने “नवीनचंद्र फाउंडेशन” द्वारा बिपिनचंद्र राठी ट्रस्ट द्वारा अनेक लोकांना न्यायदानाचे दालन उभारून ,समाजसेवा करून, आत्मिक समाधान प्राप्त करू शकता .
जिल्हा न्यायलयाच्या सरकारी पगड्यात आज पर्यंत जे जे मनात होतं परंतु करू शकत नव्हतो, कायद्याविषयीचे आज पर्यंत जे जे मनात होते परंतु करू शकत नव्हतो,कायद्याविषयीचे कडू-गोड अनुभव की ज्यात बदल करावासा वाटत होता ,सुचवावयाचे वाटत होते…. पण जबाबदारी व नियमांचे उल्लंघन नको म्हणून आपण करू शकलो नाही ,ते सर्व आपण करू शकता .
जसे पोलीस खात्यात रिटायर झाल्यावर अनेक कमिशनर साहेबांनी आपल्या पुस्तकांद्वारे यंत्रणा त्यातील अपेक्षित बदल कसे असतात ते सुचविले .
ज्वलंत उदाहरण किरण बेदी देता येईल.
लोकन्यायालय त्यांनी उभं केलं….
येणाऱ्या प्रत्येक तरुण वकीलाला आधार देऊन, त्याला मौलिक मार्गदर्शन देऊन आदर्श वकील बनवून त्यातच आपण नवीन ला पाहू शकता.
हे सर्व ऐकल्यावर प्रसन्न चित्ताने जज्ज साहेबांनी आभार मानले .
नवी योजना ,नदी आशा, नवी दिशा मिळाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते .
मलाही आनंद वाटला.
वैद्यकीय मदतीबरोबर मानसिक आधार त्यांना देऊ शकलो .
आजही अशा घटनां…. माझ्या समोर आलं तर सतत जज्ज साहेब आठवतात.
डॉक्टर शालिग्राम भंडारी.