विधवा प्रथा मुक्ती अभियान संकल्पपूर्ती साठी १५ ऑगस्ट ग्रामसभेत ठराव घ्यावेत – रणधीर नाईक.
शिराळा प्रतिनिधी / शिराळा व वाळवा तालुक्यात विधवा प्रथा मुक्ती अभियानाचा संकल्प केल्याप्रमाणे १५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत अजूनही ज्यांनी विधवा प्रथा मुक्ती अभियान बाबत ठराव घेतले नसतील त्यांनी तसे ठराव घेऊन प्रत्यक्षात या संकल्पनेची पूर्ती करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले आहे.
यावेळी बोलताना रणधीर नाईक म्हणाले, गेल्या २ महिन्यात शिराळा व वाळवा तालुक्यात विधवा प्रथा मुक्ती अभियान जोमाने राबविले आहे. १५ ऑगस्ट पूर्वी ज्या ग्रामपंचायतीने ठराव घेतले आहेत त्यांनी निव्वळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात या संकल्पनेची अंमलबजावणी करावी. ज्या ग्रामपंचायतने अजूनही तसे ठराव घेतले नसतील तर ते १५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत घ्यावेत.
विधवा महिलांना रूढी परंपरेच्या जाचक बंधनातून मुक्त करण्यासाठी दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात हे अभियान यापुढे तेथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातत्याने राबवावे. याकरिता राजकीय गट तट विसरून सर्व पक्षीय लोकांनी एकत्र यावे. महिलांना सन्मान मिळवून देऊन त्यांना त्यांचा सुवासिनीचा हक्क देण्यासाठी आता समन्वयातून सामूहिक प्रयत्न करावेत.
सण, समारंभ, शुभकार्य अशा ठिकाणी विधवा महिलांना बोलवून त्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घ्यावा. आधुनिक महाराष्ट्रात वावरत असताना महिलांवर होणाऱ्या विधवा प्रथेतील अन्यायाविरोधात पुरुषांनी एकत्रित येऊन या प्रथेला विरोध केला पाहिजे. यासाठी संकल्प केल्याप्रमाणे सर्वांनी काम करावे. विधवा प्रथेबद्दल मुक्तीसाठी जनजागृती करून ते निर्मूलनासाठी विशेषतः ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घ्यावा असेही रणधीर नाईक शेवटी म्हणाले.
.