खाकीतील प्रामाणिकता…
ईगल न्युज अमळनेर
प्रतिनिधी एस एम पाटील
समाजाकडून व माध्यमातून पोलिसांवर नेहमीच टीकेची झोड उठत असते .परंतु कर्तव्य पार पाडत असताना बहुतांश कर्मचारी आपल्या कर्तुत्वाने व प्रामाणिकतेने आपले कर्तव्य सिद्ध करत असतात .अशीच एक घटना काल अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली ,अमळनेर येथील अंचिबा ज्वेलर्सचे मालक विनोद वर्मा हे बाहेरगावी गेले होते ते रात्री १:०० वाजता बाहेरगावाहून घरी आले तेव्हा गाडीतील सामान व बॅग उतरून त्यांनी दुकानाच्या ओट्यावर ठेवली व घाईघाईत शटर उघडून बाकी सामानासोबत ते घरात निघून गेले. दरम्यान जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री डॉक्टर प्रवीण मुंढे यांचे आदेशावरून रात्रीची गस्त सक्तीने होणे कामी आर एफ आय डी गार्ड मॉनिटरिंग सिस्टिम ही प्रणाली माननीय अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव ,माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव व जयपाल हिरे पोलीस निरीक्षक अमळनेर यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आली आहे, त्यानुसार दिनांक 24 /1/ 2022 रोजी पोलिस हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे व पो. ना. विनोद धनगर हे ड्युटीवर गस्त घालीत असताना रात्री ३:४५ वाजता सराफ बाजारात गस्तीवर असताना त्यांना एक बॅग दिसली त्यात सोन्याचे दागिने रोख रक्कम चेक व इतर कागदपत्र आणि लायसन्स असलेले पिस्टल आढळून आले यावरून त्यांनी त्या दुकानाचे मालक विनोद वर्मा यांचे दुकानाचे शटर ठोठावून त्यांना बाहेर बोलावले व चौकशी केली असता वर्मांनी सांगितले की मी रात्री १:०० वाजता बाहेरगावाहून आलो व घाईत सामान उचलून घरात निघून गेलो व बॅग बाहेरच विसरलो .दोन्ही अंमलदारांनी सखोल चौकशी केली असता ती पिशवी त्यांचीच आहे याची खात्री करून घेतली व ती त्यांना परत केली .त्या पोलिसांचा प्रामाणिकपणा पाहून व्यापारी विनोद वर्मा यांनी अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये येऊन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या उपस्थितीत त्या दोघी पोलिसांचा सत्कार केला व पोलीस प्रशासनाबद्दल गौरवोद्गार काढून आपल्या भावना व्यक्त करून पुनश्च त्यांचे आभार मानले.
या घटनेमुळे अंमळनेर पोलिसांची मान उंचावल्याचीच चर्चा शहरात दिवसभर होती.