गायरान जमीन बेघर कुटुंब अतिक्रमणे कायम करावीत खासदार माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
शिराळा प्रतिनिधी
राज्यातील गायरान जमिनीमध्ये बेघर कुटुंबांनी सन २०२१ पर्यंत केलेली अतिक्रमणे कायम करणेबाबत शासनस्तरावर निर्णय घेणे व उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करुन सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्यावतीने जनतेची बाजू मांडण्याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्र दिले.
पत्रात म्हंटले आहे, केंद्र व राज्य सरकारने सन २०२२ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची महत्वकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या करीता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण) व राज्य पुरस्कृत रमाई आवास, शबरी आवास व इतर योजनांची अमंलबजावणी राज्यात केली जात आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतीनी प्रशासनाकडे गावठाण हद्दवाढ होणेबाबत यापुर्वी प्रस्ताव दिलेले असून ती गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.त्यामुळे अनेक गरजू,बेघर लोकांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनेतून व काही लोकांनी कर्ज काढून गायरान जमिनीत अतिक्रमण करून घरे बांधली आहेत.राज्य शासनाने यापूर्वी संदर्भिय शासन निर्णयानुसार दि.१ जानेवारी २०११ पर्यंतची अतिक्रमण करुन राहणाऱ्या सर्व अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत मंजूरी देऊन सर्व ग्रामपंचायतींना विहित नमुन्यामध्ये मार्गदर्शक तत्वानुसार अतिक्रमण धारकांचे प्रस्ताव पाठविणेबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार अनेक ग्रामपंचायतीनी आपल्या हद्दीतील अतिक्रमणाची माहिती शासन संकेतस्थळावर अपलोड केली आहे.त्याबाबतची प्रक्रिया प्रलंबित असताना मुंबई उच्च न्यायालयाने दि.६ ऑक्टोबर २०२२ रोजी राज्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमणे निष्काषीत करावीत असा निकाल दिला आहे.या निकालामुळे राज्यातील गोरगरीब,गरजू,बेघर, कुटुंबावर अन्याय होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक संसार उध्वस्त होणार असून लाखो लोक बेघर होणार आहेत.तरी वरील वस्तूस्थिती विचारात घेऊन गायरान जमिनीमध्ये गोरगरीब, गरजू, बेघर कुटुंबांनी सन २०२१ पर्यंत केलेली अतिक्रमणे कायम करणेबाबत शासनस्तरावर निर्णय घ्यावा व उच्च न्यायालयामध्ये फेरविचार याचिका दाखल करावी व सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्यावतीने जनतेची बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती खासदार माने यांनी पत्रव्दारे केली आहे.
यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवींद्र माने उपस्थित होते