चेंबूरमध्ये मेट्रो कामासाठी लावलेल्या पत्र्यांमुळे पालिकेच्या पावसाळी कामांमध्ये मोठा अडथळा
भाजप नगरसेविका आशा मराठेंची तक्रार
मुंबई – चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १५२ मध्ये मेट्रो लाईन २ बी आणि मेट्रो लाईन ४ च्या कामासाठी मागील चार वर्षांपासून रस्त्यांवर पत्रे लावून ठेवलेले आहेत.धक्कादायक बाब म्हणजे हे काम सुरुवातीपासूनच कासवगतीने चालत आले असून आता तर ते बंद अवस्थेत आहे.त्यामुळे अशा बंद कामासाठी लावलेल्या पत्र्यांमुळे पालिकेला पावसाळी कामे करणेही अशक्य झाले आहे.तसेच या पत्र्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याने हे पत्रे काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा अशी मागणी भाजपच्या स्थानिक नगरसेविका आशाताई मराठे यांनी एमएमआरडीए आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
मेट्रो कामासाठी सीएसटी रोड कुर्ला सिग्नल व्ही.एन.पुरव मार्ग ते मैत्री पार्क आणि सिद्धार्थ कॉलनी सर्व्हिस रोड,तसेच पी.एल.
लोखंडे मार्ग व पी.वाय. थोरात मार्गावरही पत्रे लावले आहेत.या पत्र्यांसाठी तेथील भाजी मंडई ,मच्छी मार्केट उठविल्याने हातावर पोट असलेल्यांचे रोजगार बुडाले आहेत.तसेच सिद्धार्थ कॉलनी सर्व्हिस रोड,पोस्टल कॉलनी जंक्शन येथे मेट्रो लाईन ४ चा खांब येत असल्याने पालिकेने मेगासिटी नाल्याचे काम थांबवले आहे.तसेच अशी अनेक ठिकाणची पावसाळी कामेही रखडली आहेत.एमएमआरडीए मात्र मेट्रोची कामे सुरू करण्यास विलंब लावत असल्याने चेंबूरकरांची अवस्था एमएमआरडीए आणि पालिकेच्या कात्रीत सापडल्यासारखी झाली असल्याचा आरोप नगरसेविका आशाताई मराठे यांनी आपल्या पत्रात केला आहे.