कविवर्य जी.एम.देशमुख यांनी लिहिलेला ‘भारताचे कोहिनूर नरेंद्र मोदी’ या कवितासंग्रह नाविण्यपूर्ण आहे-लेखिका प्रा.दीपाली सोसे
अकोला(दि.४)
ज्येष्ठ कवी जी.एम.देशमुख उर्फ दास गोविंद यांनी लिहिलेला ‘भारताचे कोहिनूर नरेंद्र मोदी’हा कवितासंग्रह नाविण्यपूर्ण असून भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी त्यांच्या मनात असलेल्या आदरयुक्त भावनेला त्यांनी कवितेच्या माध्यमातून शब्दबध्द केले आहे,ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे,असे गौरवोद्गार सुप्रसिध्द लेखिका प्रा.दीपाली आतिश सोसे यांनी समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातून काढले.
त्या ज्येष्ठ कवी जी.एम,देशमुख यांच्या पिंपळखुटा येथे झालेल्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होत्या.प्रा.दीपाली आतिश सोसे यांच्या शुभहस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी या समारंभाला ज्येष्ठ समाजसेवक प्रल्हादराव दांदळे,ज्येष्ठ कवी तुळशीराम बोबडे,अकुर साहित्य संघाचे पदाधिकारी देवानंद गहिले,डाॅ.शांतीलाल चव्हाण, नारायणराव अंधारे,एस.एन.तायडे,सरपंच अलका वाहोकार,विजया देशमुख,मंगला वानखडे,मंगला दांदळे,जगन्नाथ खरप उपस्थित होते.सर्व पाहुण्यांनी यावेळी भाषणांमधून कवी जी.एम.देशमुख यांना शुभेच्छा दिल्या.दिनकर बोबडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कवी दास गोविंद यांनी शेकडो कविता लिहिल्या असून आतापर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली असून यापूर्वी त्यांनी ‘राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’यांच्यावर लिहिलेल्या कवितासंग्रहाने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली.त्यांनी अनेक आध्यात्मिक गीत मालिकेत अभिनयही केला आहे.सातव्या राज्यस्तरीय शुभम मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
दास गोविंद यांच्या ‘भारताचे कोहिनूर नरेंद्र मोदी’ या पुस्तकाला प्रसिद्ध लेखिका प्रा.दीपाली सोसे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून त्यांच्याच अध्यक्षतेत व त्यांच्याच शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा व्हावा,हा माझ्या आजवरच्या लेखनकार्याचा सन्मान असल्याची प्रांजळ भावना कवी दास गोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.