राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन. चरित्र आजही प्रेरणादायी प्रा. डॉ. जे. एस. इंगळे
– राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे 30 वर्षे प्रमुख प्रशासक या नात्याने माळवा प्रांताचा कारभार अत्यंत चोख केला. त्या इंदूर राज्याच्या प्रमुख महाराणी होत्या. आपले पराक्रमी सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी मिळवलेले राज्य त्यांनी नुसते टिकवले नाही तर चांगला कारभार करून त्या राज्याला संपूर्ण देशात मोठा नवलोकिक मिळवून दिला, असे प्रतिपादन अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि प्रोफेसर डॉ. जे. एस. इंगळे यांनी केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त हुपरी येथील चंद्राबाई शांतप्पा शेंदुरे महाविद्याल्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आणि कार्य या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की, अहिल्यादेवी यांनी आपल्या 30 वर्षाध्या कारकिर्दीत राज्याच्या हिताची अनेक कामे केली. भिल्ल, गोंड इत्यादी आदिवासी लोकांना नोकऱ्या देऊन राज्यातील गुन्हेगारी कमी केली. चोर व दरोडेखोर यांचे प्रबोधन करून त्यांना सन्मार्गांवर आणले. राज्यातील स्त्रियांच्या विकासासाठी चांगले कायदे केले. विधवा स्त्रियांना सन्मान दिला.त्यांच्या मालमत्तेचे सौरक्षण केले. राज्यात चांगली व आदर्श न्यायपंचायत निर्माण केली. त्या स्वतः हुशार व अभ्यासू न्यायाधीश होत्या. अहिल्यादेवी यांनी आपल्या राज्यातील कृषी, उद्योग आणि व्यापार क्षेत्राचा विकास केला. काही सामाजिक सुधारणा सुद्धा केल्या. हुंडा पद्धत बंद केली. अस्पृश्यता पाळू दिली नाही. त्या स्वतः अस्पृश्यता पाळत न्हवत्या. त्यांनी गरीब लोकांसाठी अनेक ठिकाणी अन्न छत्रे, धर्मशाला उघडल्या. अनेक पाणपोया उभारल्या. चांगले व समृद्ध ग्रंथालय उभारले. मंदिरे, घाट, रस्ते, तलाव, विहिरी यांचे बांधकाम केले. मोठी शहरे उभी करून तेथे अनेक कारागीर आणून हस्तव्यवसाय सुरु केले. स्त्रियांना लष्करात व. प्रशासनात . नोकऱ्या दिल्या. त्यांनी स्त्रियांची मोठी फौंज उभी केली होती. त्यांना कायद्याचे खूप चांगले ज्ञान होते. त्यांनी अनेक जाचक कायदे रद्द करून नवीन चांगले कायदे केले. त्या स्वतः वकील व राजदूत यांच्या नेमणूक करत असत. अहिल्यादेवी यांनी मरेपर्यंत आपल्या प्रजेची काळजी वाहिली. त्यांनी लेखक, क्लावंत,.विद्वान, कारागीर, संशोधक यांना मदत केली. असा या थोर महाराणीचे आजही स्मरण केले पाहिजे, असे विचार डॉ इंगळे यांनी मांडले. या कार्यक्रमास विद्यार्थी मोट्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष प्रा राजेंद्र सुतार यांनीही आपले विचार मांडले.