ब्यॅरिस्टर पी. जी. पाटील यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोलाचे प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे
एक आदर्श शिक्षक, कुशल प्राचार्य,कार्यक्षम कुलगुरू, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ब्यॅरिस्टर पी. जी. पाटील महाराष्ट्राला परिचित आहेत. एक विद्वान म्हणून त्यांची महाराष्ट्राला जशी ओळख आहे, तशी एक लढव्यया स्वातंत्र्यसेनानी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे.असे प्रतिपादन हुपरी येथील शेंडूरे कॉलेजमधील अर्थशास्त्र विषयाचे प्रोफेसर आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयवंतराव इंगळे यांनी केले. ते एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे ब्रिक्स वर्ल्ड ऑफ ट्रॅडिशन्स, मोस्को, रशिया आणि रयत शिक्षण संस्था यांनी आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत बोलत होते. या परिषदेत डॉ. इंगळे यांनी “ब्यॅरिस्टर पी. जी. पाटील यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान” या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला.
ब्यॅरिस्टर पी. जी. सर सांगली येथे शिक्षण घेत असताना त्यांनी महात्मा गांधी यांच्या हाकेला ओ देऊन 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली होती.त्यांनी सांगली येथील सर्व विद्यार्थी एकत्र करून अनेक दिवस विलीन्गडन कॉलेज बंद पाडले.कॉलेजच्या गेटवर थांबून ब्रिटिश सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच पी. जी. पाटील ब्रिटिश राजवटीच्या विरोधात भाषणे देत होते. त्यांनी सर्व विद्यार्थी मित्रांना गोळा करून सांगली ते कुपवाड अशी पदयात्रा काढली. आणि लोकांत जनजागृती केली. कुपवाड गावात जाऊन सगळा गाव स्वच्छ केला. लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्यानंतर गावातील लोकांना एकत्र करून ब्रिटिश राजवटीच्या विरोधात जोरदार भाषण केले.
अनेक दिवस कॉलेज बंद पाडल्यामुळे ब्रिटिश सरकार पी. जी. पाटील यांच्यावर चिडून होते. त्यांना गोळी घालून ठार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत होते. एवढा बुद्धिमान मुलगा गोळीबारात मरू नये असे त्यांचे गुरु प्राचार्य डॉ. गोकाक यांना वाटत होते. त्यांनी प्रयत्न करून त्यांचा जीव वाचवला. सरकारने पी. जी. ना अटक करून पुण्यात येरवडा येथे कारागृहात डांबले. त्यांनी सुटकेसाठी ब्रिटिश सरकारची कधीही मनधरणी केली नाही. सुमारे एक वर्षांनी त्यांची सुटका झाली. त्यानंतर ते पुण्यात पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले.