प्रथम हे देशाच्या बेरोजगार मुक्तीचे प्रमुख केंद्र……आमदार ज्ञानराज चौगुले
किल्लारी, ता. औसा, ता. ९ (प्रतिनिधी) :
देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रोजगार नसल्याने देशासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या समस्येवर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने कौशल्यविषयक विविध कोर्सेसच्या माध्यमातून हजारो सुशिक्षीत बेरोजगारांना देशातील विविध राज्यातील केंद्रात प्रशिक्षण देऊन देशातील नामाकिंत कंपनीमध्ये नोकरीच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला जात आहे म्हणूनच प्रथम हे देशाच्या बेरोजगार मुक्तीचे प्रमुख केंद्र असल्याचे मत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केले.
किल्लारी ता. औसा येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन विभागीय कार्यालयात राज्यस्तरीय बेरोजगार मुक्त युवा पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी शुक्रवारी (ता.८) रोजी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ज्ञानराज चौगुले बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे हे होते. या वेळी उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले, प्रसिद्ध कवी अमर देशेटवार, प्रथम संस्थेचे विभाग प्रमुख सदाशिव साबळे, केंद्रप्रमुख शिला बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
लातूर व उस्मानाबाद जिल्हयातील बेरोजगारासाठी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून प्रथम संस्थेच्या साह्याने रोजगार मिळवून देणाऱ्या ११ सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आमदार चौगुले यांच्या हस्ते राज्यस्तरीय बेरोजगारमुक्त युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. महेश मोटे व डॉ. संजय अस्वले यांनी प्रथम संस्थेच्या कार्याचा गौरव करून मराठवाड्यातील बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उमरगा रोटरीचे माजी अध्यक्ष प्रा. युसूफ मुल्ला, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप जाधव, अँड. शितल चव्हाण फाउंडेशनचे सत्यनारायण जाधव, बालाजी गायकवाड, राष्ट्रवादीचे वाघंबर सरवदे, बलसूरचे सरपंच राजश्री नांगरे, पंचायत समितीच्या सदस्या क्रांती व्हटकर, रविराज राठोड, विक्रम दासमे, पत्रकार कृष्णहरी लोंढे यांना राज्यस्तरीय बेरोजगार मुक्ती युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनर बालाजी भालेराव, दिनेश धुळे, शिलरत्न शेळगे, ॲड. अंगुलकुमार सुर्यवंशी, इस्माइल तंटे, आमर कांबळे, राहूल सगर, सोमनाथ घोडके, बसवराज साताले, योगेश पांचाळ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव साबळे यांनी केले. सुत्रसंचलन सुमीत कोथिंबिरे तर आभार शिला बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमास लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.