देव तारी त्याला कोण मारी”मेंदूचा तुकडा पडूनही डॉक्टरांकडून तरुणाला जीवदान
प्रतिनिधी-लक्ष्मण राजे
भिवंडी :- जीवनाची दोरी घट्ट असली की मृत्यु आल्यावर सुद्धा त्यावर मात होऊ शकते, याचा प्रत्यय भिवंडीतील एका युवकाला अनुभवास मिळाला.
भिवंडी तालुक्यातील रांजनोली येथील रमेश पटेल वय २४ हा युवक नेहमीप्रमाणे सकाळी भिवंडी-कल्याण रस्त्यावरून कामावर चालत जात असताना या रस्त्यावरील निसर्ग ढाबा जवळ एका ठिकाणी बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम चालू होते.तसेच त्यावेळी अचानकपणे जेसीबीचा चाक फुटल्याने त्या चाकाची लोखंडी रिंग अतिशय जोरदारपणे रमेशच्या डोक्यावर जाऊन आदळली.या जोरदार फटक्यामूळे सदर युवक सुमारे दहा फूट लांब फेकल्या गेला, आणि डोक्याला तीव्र स्वरूपाची दुखापत होऊन त्यात त्याचा मेंदू बाहेर आला, आणि तो बेशुद्ध पडला.ही घटना येथील समाजसेवक करसन ठाकरे यांनी पहाताच त्यांनी लागलीच जवळील प्राणायू हॉस्पिटलचे डॉ.राजेश भोईर यांना संपर्क साधून त्या युवकाला प्राणायू हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि ओळख नसतानासुद्धा सदर युवकासाठी जो काही खर्च येईल तो करून त्याचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली.यावर येथील डॉक्टरांनीसुद्धा त्याचे प्राण वाचविण्यासाठी मेंदू बाहेर येऊनसुद्धा जोखीम घेतली आणि आपत्कालीन कक्षातील डॉ.मेधा चौधरी यांनी डॉ.राजेश भोईर यांच्या सल्याने उपचार चालू केले.सर्वात प्रथम त्याला व्हेंटिलेटरवर ठेवून ऑपरेशन करण्यासाठी घेतले.सदर युवकाच्या डोक्याची जखम एवढी गंभीर स्वरूपाची होती की हाडांचे बारा ते पंधरा बारीक तुकडे त्याच्या मेंदूमध्ये गेले होते.ते डॉ.भोईर यांनी शस्त्रक्रिया करून काढून टाकले आणि माती,दगड घुसून खराब झालेला लोंबकळत असलेला मेंदूचा तुकडा सुमारे पाच तास शस्त्रक्रिया करून काढून टाकला आणि मेंदू सुरक्षित केला.त्यानंतर पुन्हा चार तासांनी मेंदूमधील सूज वाढल्याने डॉ.समीर पारेख आणि डॉ.राजेश भोईर यांनी एक शस्त्रक्रिया केली आणि सदर युवकाचे प्राण वाचविले.प्राणायू हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पैशाची अपेक्षा न करता मेहनत आणि प्रयत्न करून जोखीम पत्करत सदर युवकाचे प्राण वाचविले आणि करसन ठाकरे यांनीही वेळीच प्रसंगावधान दाखवून त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार करविले याचे सर्वत्र कौतुक होत आहे.यातून हेच सिद्ध होते की देव तारी त्याला कोण मारी.शस्त्रक्रिया करून देखील मेंदूला तीव्र जखमा होत्या आणि अक्षरशः मेंदू लोंबकळत होता त्यामुळे सदर रुग्ण जगेल की दगावेल याबद्दल शंका होती तरीही आम्ही जोखीम घेतली आणि त्याला बरं केलं यामुळे एक निरपराध युवकाचा जीव वाचविला याचे समाधान वाटते.अशी माहिती डॉ.राजेश भोईर प्राणायू हॉस्पिटल यांनी दिली.