सिद्धेश्वर नगर पाडळेवाडी येथील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा – सुधीर दाभाडे.
शिराळा प्रतिनिधी
गेले अनेक वर्षे पाडळीवाडी गावातील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील लोकांना पाण्याच्या चिंतेने ग्रासले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे उलटली परंतु सदर गावातील या लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावामध्ये पिण्याचा पाण्याची व्यवस्था करण्याचे योजले होते परंतु सदर योजनेचे कामकाज अपूर्ण असल्याकारणाने येथील मंदिर परिसरातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायत पाडळीवाडीमध्ये सदर लोकांनी वेळोवेळी सांगूनही अद्याप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही. प्रत्येक वेळी पंधरा दिवसात, महिन्यात करतो अशा पद्धतीची उत्तरे मिळत आहेत . परंतु आज पर्यंत येथील माणसांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होत नाही. निवडणूक जवळ येताच सदर माणसांना आश्वासने दिली जातात परंतु निवडणूक झाल्यानंतर या माणसांना दिलेली आश्वासने पूर्ण होण्यासाठी ग्रामपंचायतीकडे, आमदार,खासदारांकडे पायपीट करावी लागते. आज महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत असणारे मा.सुधीर दाभाडे यांनी सिद्धेश्वर नगर पाडळीवाडी येथील लोकांच्या उपस्थितीत पंचायत समिती , शिराळा येथे पाण्याच्या प्रश्नाबाबत विचारणा करण्यासाठी भेट दिली. त्यावेळी येथील अधिकाऱ्यांनी सुद्धा एका आठवड्यामध्ये सिद्धेश्वर नगर पाडळीवाडी येथील पाण्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले.
त्यानंतर पंचायत समिती येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांना सर्वांच्या स्वाक्षरीने आज पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी निवेदन दिले. एका आठवड्यामध्ये पाण्याचा प्रश्न जर सुटला नाही तर तीव्र निषेध आंदोलन पंचायत समिती, शिराळा येथे करण्यात येईल असा इशारा सर्व लोकांनी दिला. तेव्हा अशा कोणत्याही आंदोलनाची वेळच यायला नको परंतु सदर मंदिर परिसरातील लोकांना मुलभूत गरज म्हणचेच पिण्याच्या पाण्याची सोय पाडळीवाडी ग्रामपंचायतीकडून व्हावी ही नम्र विनंती येथील नागरिकांनी केली.
निवेदन देताना मा. राजाराम गिरीगोसावी(माजी मुंबई पोलीस), महादेव गिरीगोसावी, शांताबाई गिरी गोसावी, यशोदा गिरीगोसावी, सिंधू गिरीगोसावी, अक्काताई गिरीगोसावी, मंजुळा गिरीगोसावी, सुमन गिरीगोसावी, मंजुळा गिरीगोसावी, वनिता गिरीगोसावी. धोंडीराम गिरीगोसावी, शिवाजी गिरीगोसावी, चंद्रकांत गिरीगोसावी आणि महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत असणारे मा. सुधीर दाभाडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.