युवकांनी सकारात्मक बदलाचे वाहक बनावे: प्राचार्य डॉ. वसंत भोसले
मानवत: बदल हा स्थायी असला तरीही तो अधिक सकारात्मक असणे हे उन्नत विकासाचे लक्षण असते. अश्या स्वरूपाच्या बदलाचे युवकांनी वाहक बनावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांनी के. के. एम. महाविद्यालय, मानवतच्या परीक्षा विभागाच्या वतीने आयोजित स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड हिवाळी-२०२० तसेच उन्हाळी-२०२१ परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या पदवी वितरण कार्यक्रमाप्रसंगी केले. वितरण कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले की, पदवीचा अधिक सन्मान व्हावा यासाठी याच्या वितरणाचे आयोजन महाविद्यालयात केले जात आहे.
आज शिक्षण क्षेत्रात अनेक चांगले- वाईट अनुभव येत आहेत. या स्वरूपाचे अनुभव घेतच पुढे चालत राहण्याचे काम आपणास करावे लागणार आहे. यास सकारात्मकतेची समर्थ जोड लाभणे अत्यंत आवश्यक आहे.
आजचा काळ हा व्यक्तिगत यशांचा आहे. त्यामुळे आत्मपरिक्षण करत पुढे जात राहणे खूप गरजेचे झाले आहे. आत्मविश्वास, मोठी स्वप्ने पाहण्याची तसेच ती साकार करण्यासाठी आवश्यक ती मेहनत करण्याची तयारी असणे गरजेचे आहे. समाजाला उन्नत करण्याची जबाबदारी ही फक्त एखाद्या विशिष्ठ वर्गाची नसून ती सर्वांचीच आहे. विशेषतः आपल्या समाजातील तरुण या बाबाबतीत सर्वात मोठी भूमिका बजावू शकतात. त्यामुळे तरुणांनी पुढे येवून याबाबतीत कृतीशील विचार करणे महत्वाचे आहे.
बदलत्या काळात प्रवाहासोबत तर रहाच परंतू त्या पुढेही जाता येईल का याचाही विचार करावा तसेच कौशल्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते विकसीत करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांनी राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात तरुणांचे योगदान खूप महत्वाचे आहे. आपल्या देशात तुलनेने ते कमी आहे. हे प्रमाण वाढण्यावर भर दिला पाहिजे असे सांगितले.या कार्यक्रमात एकुण ६८ विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण करण्यात आले. पा. ता. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्री विजयकुमार कत्रुवार, सचिव श्री बालकिशनजी चांडक यांच्यासह परीक्षा विभाग प्रमुख डॉ. शारदा राऊत,उपप्राचार्य डॉ बी एस. गीते, डॉ. के. बी. पाटोळे, डॉ. दुर्गेश रवंदे, डॉ. पवन पाटील यांची मंचावर उपस्थिती होती. उपप्राचार्य डॉ किशोर हुगे यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. शारदा राऊत,सूत्रसंचालन डॉ. संदीप राठोड यांनी केले तर आभार डॉ. के. बी. पाटोळे यांनी मानले.