पालघर जिल्ह्यातील पंचवीस शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार पर्यावरण विषय
प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी, दिनांक
७
पालघर जिल्ह्याला लाभलेल्या निसर्गाच्या वरदानाचा लाभ घेऊन जिल्ह्यातील २५ शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरण हा विषय सुरू करण्याचे रोटरी क्लब ने जाहीर केले.
या संदर्भात माहीम येथील भुवनेश किर्तने विद्यालयाच्या सभागृहामध्ये मंगळवारी( ता. ७) शिक्षण तज्ञ, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची संयुक्त सहविचार सभा संपन्न झाली.
या सभेमध्ये माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, अलीकडे निसर्गापासून दूर चाललेल्या मानवाला रोखण्यासाठी पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी बाल वयातच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे बाळकडू पाजण्यासाठी पर्यावरण हा विषय त्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तर शिक्षण तज्ञ उर्मिला प्रभू यांनी या शैक्षणिक वर्षापासून पालघर जिल्ह्यातील निवडक २५ शाळांमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गासाठी पर्यावरण हा विषय राबविण्यात येणार असून त्यासाठी काम करणाऱ्या शिक्षकांना योग्य तो मोबदला सुद्धा दिला जाईल. तसेच यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी रोटरीचे असिस्टंट डिस्ट्रिक गव्हर्नर भगवान पाटील, माहीम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील,भुवनेश किर्तने विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर गवादे, प्रा. महाजन,
रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे रितू बगला, निखील भाटिया विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षात प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता सहावी साठी तर पुढील दोन शैक्षणिक वर्षात अनुक्रमे इयत्ता सातवी आणि आठवी च्या वर्गांना हा प्रकल्प स्वरूपात विषय राबविला जाईल. शाळेच्या वेळे व्यतिरिक्त शिक्षक या विषयासाठी काम करणार असून त्यांना खास मानधन सुद्धा दिले जाईल. या अभ्यासक्रमाची कृतिपुस्तिका तज्ञ मार्गदर्शकांकडून तयार करण्यात आली असून लवकरच ती सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. पुढील रोटरीचे पुढील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप अगरवाला यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प हाती घेतला आहे.