मालती कन्या महाविद्यालयात फटाके मुक्त दिवाळी अभियान
इस्लामपूर दि. वार्ताहर “फटाक्यांच्यामुळे ध्वनी, वायू व भू प्रदूषण होते. अपघाताने भाजणे वआग लागणे अशा समस्या निर्माण होतात.फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखे विषारी घटक असतात, जे हवेत धुलिकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावतात.”असे प्रतिपादन प्रा के बी पाटील यांनी केले.ते येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये फटाके मुक्त दिवाळी अभियानामध्ये बोलत होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाविद्यालयाच्या विवेक प्रबोधिनी मार्फत घेण्यात आलेल्या अभियानात बोलताना ते पुढे म्हणाले,फटाक्यांच्या धुरातून कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, मॅग्नेशियम ट्राय ऑक्साईड अशा प्रकारचे अत्यंत विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे दमा, ब्रॉन्कायटिस (फुप्फुसाच्या नळ्यांना सूज), श्वसनसंस्थेची चुरचुर, खोकला, अॅलर्जी, हृदयरोग,हार्ट फेल्यूअर व फुप्फुसांची झीज अशा प्रकारचे विकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना जडतात. मोठ्या फटाक्यांचे आवाज 100 डेसिबल पेक्षा जास्त असतात. फटाक्यांच्यामुळे होणाऱ्या ध्वनि-प्रदूषणामुळे रक्तदाबात वाढ, चिडचिड, मानसिक व भावनिक ताण, श्रवणदोष, आम्लपित्तात वाढ इ. दुष्परिणाम संभवतात. रात्री-अपरात्री उडवलेल्या फटाक्यांमुळे निद्रानाश होतो. लहान मुले, वयोवृद्ध, रुण ह्यांचा जीव घाबरतो. अभ्यासात व्यत्यय येतो. पशु-पक्षी बिथरतात.”
ग्रहणे समाज व समाज या विषयावर बोलताना ते म्हणाले, “वर्षातून किमान तीन ग्रहणे येतातच. सूर्याची कोणतीही धोकादायक किरणे ओझोन वायूच्या थरात शोषली जातात त्यामुळे त्याचे कोणतेही वाईट परिणाम गरोदर स्त्रिया लहान मुले व वृद्धांच्या वर होत नाहीत. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असून त्याचे कोणतेही अनिष्ट परिणाम मानवावर होत नाहीत. त्यामुळे ग्रहणे पाळणे सोडून द्यावे. जगातील कोणत्याही धर्मात ग्रहणे पाळत नाहीत. त्यांचे काहीही वाईट होत नाही”
प्रा डॉ राम घुले म्हणाले,”फटाक्यांवरील खर्च हा त्यातील एक अनुत्पादक खर्च आहे. फटाके उडवणे म्हणजे पैसा शब्दशः जाळणे! अशा खर्चाने मालमत्ता उभारली जात नाही व महागाई वाढते, आर्थिक प्रगती खुंटते. भारताच्या आर्थिक प्रगतीत फटाके वाजविणे अडथळा आहे. फटाके आकाश कंदील व व लाईटच्या माळा या चीन मधूनच येतात. अप्रत्यक्षपणे आपण चीन सारख्या धोकादायक शत्रू राष्ट्र आपल्या विरुद्ध मजबूतच करतो. फटाक्यांच्या मधील विषारी घटकांच्यामुळे फुलांच्या फलन प्रक्रियेत बाधा निर्माण होऊन निसर्गचक्र बिघडते.”
प्रा.बी.डी. खामकर म्हणाले, “मुले विज्ञानवादी बनवा दूषित विचारांची स्वच्छता करा हीच खरी दिवाळी होय”
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बेलवटकर म्हणाले,”फटाक्यांच्या ऐवजी मुलांनी किल्ले बनवावेत, पुस्तके वाचावीत, खेळ खेळावेत. फटाक्यांच्या वाचविलेल्या पैशातून गरजूंना कपडे व फळांचे वाटप करावे”
याप्रसंगी ‘फटाके मुक्त दिवाळी अभियानाची’ पत्रके वाटवण्यात आली. 200 विद्यार्थीनी फटाके न वाजविण्याची संकल्पपत्रे भरून दिली.
कार्यक्रमास प्रा. डॉ.स्नेहल हेगिष्टे, प्रा. डॉ. वृषाली पाटील, प्रा. डॉ.संजीवनी पाटील, प्रा डॉ मेघा पाटील, प्रा. निलेश डामसे व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. कु.मृणाल मोहिते व कु. साक्षी माने यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार कु. प्राजक्ता वाघ हिने मानले.