आज पासून मुंबई शहर कबड्डी असो.च्या कार्यकारिणीचे दोन दिवसाचे “पावसाळी शिबीर” नागांव-अलिबाग येथे होणार.
खेळाडू संघ बदल कालावधी, छोट्या खेळाडूंकरिता नवीन वयोगट यावर महत्वपूर्ण चर्चा.
मुंबई :- मुंबई शहर कबड्डी असो.च्या विद्यमाने दि. ०२ आणि ०३जुलै २०२२ रोजी कार्यकारिणी मंडळाचे “पावसाळी शिबीर” नागांव-अलिबाग येथील इनकासा रिसॉट येथे होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिबिरात असोसिएशनच्या कार्याचा त्याच बरोबर कबड्डी खेळ आणि खेळाडू यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सखोल चर्चा करून निर्णय घेतले जातील. यात छोट्या गटातील खेळाडूंना कबड्डीकडे वळविण्याकरिता किती वयोगट असावा.
त्याचबरोबर आज खेळाडू जे सतत संघ बदल करीत असतात त्यांना चाप लावता यावा म्हणून बदलीच्या कालावधीत काही वाढ करता येईल का? या व अशा अनेक चांगल्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून या शिबिरात निर्णय घेतले जातील. अशी माहिती संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी दिली.
या शिबिराचे उदघाटन शनि. दि. ०२जुलै २०२२ रोजी सायं. ०५-०० वा. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे सरचिटणीस आस्वाद पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मुंबई शहरचे अध्यक्ष भाई जगताप हे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या तांत्रिक समितीचे प्रमुख जे.जे.पाटील व मुंबई शहरचे उपाध्यक्ष शिवकुमार लाड, कार्याध्यक्ष मनोहर इंदुलकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात संमत झालेले प्रस्तावास त्याच ठिकाणी होणाऱ्या कार्यकारिणी मंडळाच्या सभेत मंजुरी देण्यात येईल.