३०० दिव्यांग व्यक्तींनी येथील केआरपी कॉलेजमधील मोफत कृत्रिम हात-पाय दान शिबिरात सहभाग
इस्लामपूर दि.१८ प्रतिनिधी
ज्यांना हात नाही,पाय नाही अशा वाळवा तालुक्यासह सांगली,सातारा,जत,शिराळा, पुणे,सोलापूर उस्मानाबाद,बुलढाणा,पंढरपूर, बेळगाव, निपाणी, अथणी,देवरुख आदी भागातील ३०० दिव्यांग व्यक्तींनी येथील केआरपी कॉलेजमधील मोफत कृत्रिम हात-पाय दान शिबिरात सहभाग घेतला. या व्यक्तींच्या हात व पायांची मापे घेतली असून महिन्याभरात त्यांना कृत्रिम हात-पाय बसविले जाणार आहे. ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही अशा दिव्यांग व्यक्तींच्या जीवनास कृत्रिम हात-पाय बसविल्यावर निश्चितपणे उभारी मिळेल,असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
राज्याचे जलसंपदा मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू सहकारी साखर कारखाना, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी,जायंट्स ग्रुप इस्लामपूर पर्ल,वाळवा तालुका राष्ट्रवादी डॉक्टर सेल,साधू वासवाणी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते. कोणी दिव्यांग कुबड्या घेऊन,तर कोणी दिव्यांग वॉकर घेऊन आले होते. बरेच दिव्यांग व्यक्ती नातेवाईकांच्या अंगा-खांद्यावरून शिबिरास आले होते. मात्र त्यांच्या डोळ्यात एक नवी उमेद दिसत होती, आता मीही स्वतः चालू शकतो,माझी दैनंदिन कामे मी करू शकतो.
प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील, श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अतुल मोरे,तालुकाध्यक्ष डॉ.अनिल माळी,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर यांनी,आम्ही ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७ ला असेच शिबीर घेतले होते. पुन्हा आता हे शिबीर घेत आहोत. महिन्याभरात या दिव्यांग व्यक्तींना चांगल्या प्रतीचे कृत्रिम हात-पाय बसवू. त्यामुळे या व्यक्तींच्या जीवनास नवी गती येईल,असा विश्वास व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल पार्क सिटीचे संदीप पाटनी, जायंट्स ग्रुपच्या माजी फेडरेशन अध्यक्षा डॉ.सुवर्णा माळी यांनीही आपण एकसंघपणे दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणण्या चे पुण्याचे काम करीत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील,साधू वासवाणी मिशनचे मिलिंद जाधव,जायंट्स ग्रुप इस्लामपूर पर्लच्या अध्यक्षा मानसी साळुंखे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख,डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ.दिलीप साळुंखे,युवक राष्ट्रवादीचे तालुका ध्यक्ष संग्राम जाधव,डॉ.संग्राम पाटील,कृष्णेचे संचालक संजय पाटील,सचिन कोळी,सुनील पोळ,बशीर मुल्ला,राजकेदार आटूगडे, प्रियांका साळुंखे प्रामुख्याने उपस्थित होते.
साधू वासवाणी मिशनचे डॉ.सुशील ढगे, डॉ.सलील जैन, राहुल सराज,जितेंद्र राठोड, डॉ.संजय जाधव,डॉ.आकाश पांडे, डॉ.धर्म राज साव्यड, इचलकरंजी येथील रोटरी क्लब चे एस.एन.अग्रवाल,रवी अडूकिया,सुजल पाटनी,सुरेश सिंघानिया,इस्लामपूर येथील डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ.दिलीप साळुंखे, डॉ.सुनील पाटील यांनी दिवसभर दिव्यांग व्यक्तींच्या हाता-पायांची मापे घेतली. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे इस्लामपूर संघटक राजाराम जाधव व सोशल मिडियाचे प्रशांत कदम,व अभियानच्या कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
प्रा.शामराव पाटील,राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील,कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी.सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे, शहराध्यक्ष शहाजी पाटील,महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, प्रदेश सरचिटणीस छाया पाटील,माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे,आष्टयाचे विराज शिंदे,संग्राम फडतरे,माणिक शेळके यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिबिरास भेट दिली.