वर्तमान काळातील जातिव्यवस्थेला शाहू महाराजांच्या विचारांनीच प्रत्युत्तर द्यावे लागेल : बाबासाहेब पाटील
सरुडकर कोल्हापूर : (वर्षाराणी दुर्गे सरुडकर): वर्तमान काळातील जातीय आणि धार्मिक द्वेषाला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनीच प्रत्युत्तर द्यावे लागेल. कारण शाहू महाराजांच्या विचारात सर्वांप्रती सद्भावना व सलोखा आहे,असे प्रतिपादन माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर यांनी केले.बांबवडे ता. शाहूवाडी येथे समतावादी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालय, थेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित केलेल्या सद्भावना परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक चंद्रकांत रेडेकर यांनी केले. यावेळी पुढे बोलताना मा.आ. बाबासाहेब पाटील सरुडकर म्हणाले, सध्याच्या राजकारणात धार्मिक द्वेषाचा विचार मांडला जातो आहे तो पूर्ण चुकीचा आहे.नव्या पिढीने अशा राजकारणाला बळी पडू नये. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती म्हणाले ,सर्व धर्मांमध्ये परस्परांविषयी सद्भावनेचा विचार रुजवण्याची गरज आहे. धार्मिक द्वेषाला भारतीय संविधानातील बंधुत्वाच्या विचारानेच सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संविधान आणि त्यातील तत्वे हीच आपल्या जगण्याचा भाग बनली पाहिजेत. यावेळी रणवीर सिंह गायकवाड म्हणाले, कोणत्याही अल्पसंख्यांक समुदायाला असुरक्षित वाटेल असे वर्तन करणे चुकीचे आहे. आपण सर्व देश बांधव म्हणून परस्परांशी बंधुभावाने वागले पाहिजे.यावेळी प्रा. प्रकाश नाईक म्हणाले,शिव- शाहूंच्या मानवतावादी विचारांनी सर्वांनी वाटचाल करणे आवश्यक आहे.देशाचे ऐक्य,सद्भावना आणि बंधुभाव कायम ठेवणे ही सर्व देशवासियांची जबाबदारी आहे. यावेळी भाई भारत पाटील, डाॕ.बी.आर.गाडवे, रमाकांत घोलप,सागर कांबळे,अल्लाबक्ष मुल्ला यांची भाषणे झाली.यावेळी नामदेव गिरी, अल्ताफ नायकवडी,विकास साठे,अतिक अत्तार,दिपक कांबळे, सुरेश नारकर,दस्तगीर अत्तार,आनंदा खामकर ,प्रा.ज्योती थोरात,प्रथमेश सुतार यांच्यासह कार्यकर्ते,तरुण व महिलांची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शिवाप्पा पाटील यांनी केले तर आभार प्रा.निलेश घोलप यांनी केले.