महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना एका महिलेचे जटा निर्मूलन करण्यात यश
इस्लामपूर, दि.३० (प्रतिनिधी)
येथील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना एका महिलेचे जटा निर्मूलन करण्यात यश आले आहे.या अधिक माहिती,सौ.अंजली अमोल यादव (वय ४० वर्षे) कळंबी गावच्या रहिवाशी आहेत.गेली चार पाच वर्षापासून केसात जटा वाढल्या होत्या.अज्ञान आणि अंधश्रध्दा,भीती यामुळे जटा वाढल्या होत्या. जटा काढल्यास देवाचा कोप होईल अशी भीती त्यांना वाटत होती,त्यामुळे जटा वाढल्या. जटा मुळे सौ.अंजली यांना घरी,शेतात कामे करताना अडथळे येत होते, जटेच्या ओझ्याने मान दुखत होती,झोप नीट होत नव्हती.पण भीती मुळे जटा कापणे शक्य होत नव्हते.त्यांच्याच नात्यातील म्हणजे त्यांच्या बहिणीची मुलगी कु.मयुरी प्रमोद सुर्वे हिच्या मावशीचा जटा,त्याचा त्रास लक्षात आला.मयुरी च्या शिक्षिका श्रीमती सुजाता शशिकांत मोरे ( यशवंतराव हायस्कूल, देवराष्ट्रे)यांना ही बाब सांगितली.सामाजिक कार्य करणाऱ्या मोरे मॅडम नी आणि मयुरी यांनी सदर महिलेचे प्रबोधन केले, जटा काढण्यासाठी प्रोत्साहन दिले.त्यानंतर मोरे मॅडमनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांच्याशी संपर्क केला.
सौ.अंजली यादव यांची भीती दूर करून,त्यांना समजावून सांगून कार्यकर्त्यांनी जटा निर्मूलन तयार केले.संजय बनसोडे,प्राचार्य डॉ. एस बी माने,सूरज उर्मिला,विवेक भिंगारदिवे,ओंकार कोळी,नामदेव कदम आदींनी हे जटा निर्मूलन केले.सुरवातीला मयुरी आणि तिच्या शिक्षिका सुजाता मोरे यांच्या हस्ते जटे चा काही भाग कापण्यात आला.इस्लामपूर अं नि स च्या वतीने गेल्या ३२ वर्षात २०० हून अधिक व्यक्तीच्या जटा निर्मूलन करण्यात यश आले आहे. जटाधारी व्यक्तीची माहिती संघटनेला कळवावी असे आवाहन संजय बनसोडे यांनी केले आहे.