आगामी 60 ग्रामपंचायत निवडणूक निकालातून विरोधकांच्या टिकेल उत्तर द्यावे – आमदार मानसिंगराव नाईक
शिराळा (प्रतिनिधी) : विरोधकांच्या टीकेला उत्तर कार्यर्त्यांनी होऊ घातलेल्या आगामी 60 ग्रामपंचायत निवडणूक निकालातून द्यावे, अशा पद्धतीने तयारी करा, अशी सूचना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
चिखली (ता. शिराळा) येथे आज मांगले व सागाव पंचायत समिती गणातील ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहिर झाल्या आहेत, तेथील स्थानिक नेते मंडळी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, आजी-माजी आमदार एकत्र आले, पण त्यांचे कार्यकर्ते एकत्र नाहीत, असा बुध्दीभेदाचा प्रचार सध्या विरोधकांकडून होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना 60 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या माध्यमातून होणाऱ्या टिकेला उत्तर देण्याची संधी आली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायत निवडणूकां महत्वाच्या आहेत. गाफील राहू नका. विरोधकांच्या बुध्दीभेदाला बळी पडू नका. लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक एकत्र असताना जसा राष्ट्रवादीचा झेंडा सर्व ग्रामपंचायतीवर फडकला होता, त्याची पुनरावृत्ती कार्यकर्त्यांनी या निवडणूकीत करावी. उमेदवार निवडताना युवा वर्गाचा संधी देण्यात यावी. यातून उद्याचे नेतृत्व तयार होईल.
यशवंतचे अध्यक्ष नाईक म्हणाले, सर्व ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या व्हाव्यात. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगभाऊ एकत्र आल्यानंतर पहिल्याच निवडणूक आहेत. त्यामुळे या निवडणूकांना विशेष महत्व आहे. विरोधकांचा सर्व ठिकाणी दारुन हेच विरोधकांना उत्तर ठरेल. कार्यकर्त्यांनी कांही झाले तरी सर्व ग्रामपंचायतीवर आपल्या विचारांचा झेंडा फडकविला पाहिजे. स्थानिक नेते मंडळींनी घेतलेल्या निर्णय आम्हाला मान्य असेल. बिनविरोध निवडणूक करण्यावर भर द्यावा. मतभेद झाल्यास विरोधकांना फायदा होईल असे वागू नका.
जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले, पहिल्या टप्प्यात ६० ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने लढावे. मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. निवडणूकां यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोठे काय सुधारणा कराव्या लागतील, ते नेते मंडळींना सुचवावे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या निर्णयासोबत सर्वजण राहतील. जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करण्यावर भर द्यावा.
प्रारंभी बिऊरचे सरपंच सुखदेव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रचितीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, रोहित व भूषण नाईक, विश्वासचे संचालक दिनकरराव पाटील, सुरेश चव्हाण, बाबासो पाटील, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील, यशवंत निकम, बिरुदेव आमरे, संदीप तडाखे यांच्यासह शहाजी नाईक, बाबुराव नांगरे, जयवंत पाटील, वारणाचे संचालक विजय पाटील, माजी उपसभापती प्रल्हाद पाटील, राजन पाटील, शिवाजी नांगरे, सागर पाटील, रघुनाथ पाटील, विजयकुमार पाटील, बळीदाजी पाटील, भीमराव गराडे, आनंदराव पाटील, मीनाताई बेंद्रे, किरण पाटील, अनिल पाटील, आनंदराव पाटील, सत्यम पाटील, बबनराव पाटील, मानसिंग पाटील, दत्तात्रय आंदळकर उपस्थित होते. बैठकीस फुफिरे, चिखली, शिराळे खुर्द, कांदे, पुनवत, मांगले, कणदूर, देववाडी, ढोलेवाडी, लादेवाडी, सागाव, कापरी, वाडीभागाई, उपवळे, नाटोली, बिऊर या ग्रामपंचायत निवडणूक लागलेल्या गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. तात्यासो पाटील यांनी आभार मानले.