मालती कन्या महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती
इस्लामपूर दि. वार्ताहर
“इतिहासात अनेक महान स्त्रिया होऊन गेल्या त्यापैकी अनेकांनी इतिहास घडविला तर काहींनी युगपुरुष घडवले. अशाच काही कर्तुत्वान स्त्रियांपैकी आद्यस्थानी आहेत राजमाता जिजाऊ. आपल्या मनातील हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ खरोखरच एक आदर्श माता होत्या. त्यांच्या प्रेरणेमुळेच स्वराज्याचा पाया रचला गेला”. असे प्रतिपादन प्रा. संजय चव्हाण यांनी केले.
ते येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय इतिहास विभाग आयोजित, अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त बोलत होते. स्वामी विवेकानंद यांचे उच्च विचार, अध्यात्मिक ज्ञान, सांस्कृतिक अनुभवाचा प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतो. विवेकानंद वेदांताचे पूर्ण ज्ञान असणारे एक अलौकिक प्रतिभावान व्यक्ती होते. त्यांनी केवळ भारताच्या विकासासाठीच कार्य केले नाहीत तर लोकांना जगण्याची कलादेखील शिकवली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील कु.श्रद्धा मोरे , कु.सुकन्या पाटील कु. सीमा बावडे ,कु. गायत्री कोमटे, कु.अनिशा कोळेकर कु. प्रीती पाटील, कु. अनुराधा शिरसाट या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा देखील घेण्यात आल्या. प्रा शेखर खोत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून,मराठी विभागातील एम.ए.भाग.2 मधील विद्यार्थिनी, कू.अर्चना देशमुख,आश्लेषा पाटील,प्रियांका पवार या विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यपीठातील गुणवत्ता यादीत विशेष गुण मिळविले बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. सुप्रिया कांबळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राची रायते व कु. उत्कर्ष बल्लाळ यांनी केले. कु. स्नेहल थोरात यांनी आभार मानले. यावेळी प्रा.डॉ.हेगिष्टे , डॉ. वृषाली पाटील, डॉ मेघा पाटील, प्रा. के. बी. पाटील डॉ.अशोक मरळे, प्रा. निलेश डामसे, डॉ. वर्षा पाटील, प्रा. डॉ. मेघा पाटील, प्रा. डॉ रत्नाकर, प्रा. रविराज सूर्यगंध, प्रा. श्रेणिक मासाळ तसेच ग्रंथपाल प्रा. बी.डी. खामकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.