लोकांची मने स्वच्छ करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांची आवश्यकता…… गोविंदराव पाटील
मुरुम, ता. उमरगा, ता. ८ (प्रतिनिधी)
देशाला वैचारिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी महापुरुषांचे विचार तरुणांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. तरुणांच्या मस्तकामध्ये चांगले विचार येण्यासाठी तरुणांनी चांगल्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली पाहिजेत. गावातील लोकांची मने स्वच्छ करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोविंदराव पाटील यांनी केले. गणेश नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘ युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास ‘ या शीर्षकाखाली वार्षिक विशेष शिबिरा समोरापप्रसंगी बुधवारी (ता. ८) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी होते. या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव महालिंग बाबशेट्टी, प्रा. डॉ. सतिश शेळके, सरपंच उषा चव्हाण, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, पोलीस पाटील कलावती चव्हाण, मुख्याध्यापक सुभाष राठोड, वर्षा राठोड आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना गोविंदराव पाटील म्हणाले की, सध्या समाजातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. यामध्ये पाणी टंचाई, आरोग्यविषयक प्रश्न, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बदलती मानसिकता, गुन्हेगारीकरण, गावातील वाद-विवाद अशा विविध समस्यांना गावातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. आई-वडिलांचे चांगले संस्कार घेऊनच तरुणांनी भविष्यात स्वतःची प्रगत साधावी. याप्रसंगी शिबिरात उत्कृष्ट कार्य केलेल्या आदित्य कांबळे, गुरुनाथ हेंडले, मनोज हावळे, शुभम राठोड, शंभूराजे काजळे, सोनाली बनसोडे, कौसर सन्नाटे, यशोदा बोडरे, दर्शना जाधव, भौरम्माताई उतके आदींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. अशोक सपाटे, कुमारी सोनाली बनसोडे, अमोल कटके आदींनी मनोगत व्यक्त केले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. संध्या डांगे, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. विनायक रासुरे, डॉ. महेश मोटे, डॉ. विलास खडके, डॉ. प्रकाश कुलकर्णी, प्रा. अजिंक्य राठोड, सतिश महिंद्रकर, योगेश पांचाळ, दिलीप घाटे, दत्ता कुंभार आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत प्रा. डॉ. रविंद्र आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.गणेश नगर, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या समारोप प्रसंगी बोलताना गोविंद पाटील बोलताना व्यंकटराव जाधव, महालिंग बाबशेट्टी, डॉ. सतिश शेळके, उषा चव्हाण, अशोक सपाटे, आप्पासाहेब सुर्यवंशी व अन्य.