शिर्डीत शांतता समितीच्या बैठकीत जातीय सलोखा राखण्याचा निर्णय
शिर्डी प्रतिनिधी
रमजान ईद तसेच अक्षयतृतीयाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत जातीय सलोख्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधीक्षक संजय सातव यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीच्या बैठक झाली. यावेळी मुस्लिम धर्मगुरू, मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, नासिरभाई दारुवाले, सलीम शेख, मौलाना मन्सूर अली, शमशुद्दीन झामदार अमीर शेख, डॉ. नचिकेत वर्षे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक झिालाल पाटील, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे उपस्थित होते. न्यायालयाच्या सुचनानुसार सर्व नियमांचे पालन करण्याच वचन मौलाना मन्सूर अली यांनी दिले तर मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांनी पक्षाच्या वतीने २९ एप्रिल रोजी शिर्डीत इफ्तार पार्टीचे मोठे आयोजन केले असून या पार्टीत शिर्डीतील सर्व धर्मियांना निमंत्रणही दिले. विशेष म्हणजे देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी संवेदनशील वातावरण असताना शिर्डीतील शांतता आणि जातीय सलोखा साईबाबांच्या कृपेने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आजही अबाधित आहे. याचा नक्कीच अभिमान आणि आनंद वाटतो असे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितले. या ठिकाणी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन आणि इतर धर्मियांचे देश विदेशातील अनेक भाविक एका छताखाली येऊन आशीर्वाद घेतात. हे शिर्डीचं खास वैशिष्ठ म्हणावे लागेल असे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी स्पष्ट केले.