पांडुरंग म्हणता म्हणता पांडुरंग व्हावे- डॉक्टर शाळीग्राम भंडारी..
देवाचा शोध घेताना मनाशी अगोदरच ठरवलं की, शब्दांची रास नको कल्पनाची आरास नको भाषेची मिजास नको फक्त मनाची आस सोडून दुसरा कुठलाही आधार नको.
आवाज न्यूज : विशेष लेख, डॉक्टर शाळीग्राम भंडारी.२९ नोव्हेंबर.
शोधीशी मानवा राउळी मंदिरी!- नांदतो देव हा आपल्या अंतरी!!-पांडुरंग म्हणता म्हणता पांडुरंग व्हावे— प्रत्येकाला जिज्ञासा असते की- हा देव कसा बोलतो? तो दिसतो कसा ?तो मला भेटेल का? मी त्याच्याशी बोलू शकेल का? हा सर्व गुंता सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे! म्हणूनच मी या देवाचा शोध घेताना मनाशी अगोदरच ठरवलं की, शब्दांची रास नको कल्पनाची आरास नको भाषेची मिजास नको फक्त मनाची आस सोडून दुसरा कुठलाही आधार नको. त्यासाठी अगोदर मनाला समृद्ध केलं पाहिजे संपन्न केलं पाहिजे म्हणून काही ग्रंथ वाचन सुरू केलं काही कथा प्रवचन किर्तनाचा आस्वाद घेतला त्यांचं मनन चिंतन केलं आणि काही निष्कर्ष काढले त्यावेळी असं लक्षात आलं की ईश्वर म्हणजेच निसर्ग आहे त्यामुळे तो सर्वत्र आहे.
मात्र तो आपल्या कर्मात बघावा कार्य करण्यात पहावा, कर्मकांडात निश्चितच ईश्वर कधीच नसतो, तो मनात असतो जनात असतो मुलात असतो फुलात असतो अश्रूत असतो, माझ्या आणि तुमच्या आरंभ आणि अंत माहित नसलेल्या आयुष्यामध्ये होईल तेवढं आणि जमेल तेवढं आपल्या आत्म स्वकीयांना मित्रांना मदतीचा हात देत त्यांच्यातच ईश्वर शोधावा आणि पांडुरंग म्हणता-म्हणता पांडुरंग पांडुरंग अनुभवावा. अशी अनुभूती घ्यावी कारण जगा आणि जगू द्या या नियमाप्रमाणे आनंदाने आयुष्य जगण्याचा तो राजमार्ग आहे प्रत्येकाच्या आयुष्यात कथा व्यथा संघर्ष संकटं येतच असतात त्यामुळे अस्वस्थ न होता सकारात्मक पद्धतीने त्याला सामोरे जाऊन आचरण केल्यास जीवन सुखाने जगता येतं आणि जर मनात श्रद्धा असेल तर त्याला प्रत्यक्ष मंदिरातील परमेश्वराच्या त्या सगुण-साकार मूर्ती तच् परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही आणि तीच मूर्ती आपल्याला आधार देत देत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी साहाय्यभूत ठरते.
याची प्रचिती मलाच प्रत्यक्ष माझ्या वैयक्तिक जीवनात मी अनुभवलेली आहे आणि म्हणूनच मित्रांनो प्रतिकूल परिस्थितीतून प्रयत्नपूर्वक मार्ग स्वीकारायच असेल तर ,प्रयत्न हाच परमेश्वर आहे आणि त्याबरोबरच परिश्रमाला पर्याय नाही इतकं साधं-सरळ प्रत्यक्ष परमेश्वराला भेटण्याचं गणित आहे, आणि ते मी मनात रुजवलं आणि आपल्या पर्यंत यामाध्यमातून पोहोचवलं जर ते आपल्याला पटलं तरच हे आपण स्विकारावं एवढीच माफक अपेक्षा .लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी.