माजी सौभाग्यवती ‘ कादंबरीतून मांडली विधवा स्त्रीयांची वास्तव व्यथा…….. ज्येष्ठ साहित्यिक भाऊराव सोमवंशी
विधवा महिलांवर आजही होणारे अन्याय-अत्याचार, दुय्यमत्व, त्यांचा मानसिक छळ, त्यांना मानसन्मानापासून दूर ठेवणे, पतीच्या निधनानंतर कपाळाचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, त्यांना पांढरे वस्त्र परिधान करण्यास भाग पाडणे, कुठल्याही सार्वजनिक शुभ कार्याप्रसंगी रोखणे, हाळदी- कुंकूवाच्या कार्यक्रमात जावू न देणे, विधवा महिलेचे तोंड बघितल्यानंतर कुठलेही शुभ कार्य होत नाही, असे मानले जाते. ही मनाला खंत व वेदना देणारी गोष्ट असल्याने या समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा बंद करण्याचा निर्धार नुकताच कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व त्यानंतर माणगावच्या ग्रामसंभांनी विधवांची अवहेलना करणाऱ्या प्रथा बंद करण्याचा ठराव करणे ही खुप प्रेरणादायी घटना घडली आहे. त्यांचे कौतुक व अभिनंदनीय गोष्ट तर आहेच परंतु मुरूम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद येथील ज्येष्ठ साहित्यिक भाऊराव सोमवंशी यांनी धम्म चक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून ता. २२ ऑक्टोबर २००४ रोजी एक सामाजिक कादंबरी ‘ माजी सौभाग्यवती ‘ नावाची लिहून गेल्या १८ वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आली होती. या कांदबरीमध्ये त्यांनी त्यांच्या मनातील विधवा महिलांविषयीच्या भावना व्यक्त करून त्यांच्याबद्दलचा मान-सन्मान, आदर आणि आपुलकीची भावना त्यांच्या मनाला कुठेतरी स्पर्श करत होती. म्हणूनच भाऊराव सोमवंशी यांनी त्यांच्या कादंबरीमध्ये पान नं. ११६ ते १२३ मध्ये त्यांनी विधवा महिलांच्या जीवनावर खऱ्या अर्थाने प्रकाश टाकून त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. त्यात त्यांनी त्या काळातील महिलांबद्दलची व्यथा, वास्तव भूमिका व विचार विविध स्त्री पात्राच्या माध्यमातून स्पष्टपणे मांडले. आजही बहुतांशी जातीधर्मांमध्ये विधवा स्त्रीयांविषयी विविध गैरसमज, प्रथांच्या माध्यमातून त्यांचा मान-सन्मान, प्रतिष्ठा नाकारण्यात येते. ही मनाला अतिशय वेदनादायी घटना असल्याची भावना आहे. आजही पुरोगामी महाराष्ट्रात विधवांच्या बाबतीत अनेक अनिष्ठ गोष्टी घडतांना दिसतात. भारतातील थोर समाज सुधारकांनी या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी उभी हयात घालवली. तरी देखील या प्रथा कमी होताना दिसत नाहीत. साहित्यीक भाऊराव सोमवंशी यांनी आपल्या कांदबरीतून त्यावेळच्या विधवांबाबत आपल्या भावना व्यक्त करुन विचारांना वाचा फोडली. परंतु त्याबाबत कुणीही दखल किंवा प्रसिद्धी दिली नाही. विधवा स्त्रियांबाबत आमूलाग्र परिवर्तन व्हावे. भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे स्थान व प्रतिष्ठा वाढली पाहिजे. याकरिता शासन, प्रशासनाने स्त्रीविषयक कायदयाची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. याकरिता पुरोगामी संस्था-संघटना व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.