पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार धैर्यशील माने यांची भेट
शिराळा प्रतिनिधी
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न समन्वय,ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यां तसेच झारखंड स्थित तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी या पवित्र भूमीला पर्यटन स्थळ न बनवण्याच्या संदर्भात दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पत्र दिले.यावेळी या तीनही महत्त्वपूर्ण प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
*महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद :* भारत सरकारचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आणि तज्ज्ञ समिती सदस्यांची बैठक आयोजित केली होती.सीमावाद हा निर्विवाद आणि शांततापूर्ण मार्गाने सोडण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण आहे.याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येई पर्यंत कोणतेही वक्तव्य करू नये असे केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी कळविले होते.मात्र बैठकीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून सातत्याने स्फोटक वक्तव्ये होत आहेत.त्याचबरोबर सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मराठी भाषिकांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दोन्ही राज्यात लोकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे.सध्या कर्नाटक सरकारने कायदा व सुव्यवस्था मुद्दा पुढे करत मला बेळगाव मध्ये जाण्यापासून रोखले आहे तरी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी निर्णय घ्यावा अशी विनंती खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.
ऊस लागवड करणारे शेतकऱ्यांच्या समस्या
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याबाबत उसापासून साखरेचे उत्पादन करणाऱ्या दोन कारखान्यांमध्ये एअर गॅप बंदी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी करावी , ऊस पिकाचा एफ आर पी चा आधार दर १०.२५ टक्के वरून १० टक्के वर बदलला पाहिजे ,ऊस उत्पादकापासून उत्पादित साखरेचा किमान विक्री दर 34 रुपये प्रति किलो असावा , श्री रंगराजन समितीने केलेल्या शिफारशीनुसार ऊस उद्योगाची महसुली उत्पन्न काढताना त्यात इथेनॉल निर्मितीचाही समावेश करावा यामुळे आर्थिक संकटात सापडलेला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
सम्मेद शिखरजी या पवित्र भूमीस पर्यटन स्थळ न बनवण्याच्या संदर्भात
सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यात आहे ही भूमी 24 तीर्थंकर यांची मोक्ष भूमी आहे.ही भूमी जगभरात राहणाऱ्या जैन धर्मियांसाठी तीर्थक्षेत्र आहे .येथे अनेक ऋषी वास करून तपश्चर्या करतात. अशा या पवित्र भूमीला झारखंड सरकार पर्यटन स्थळ बनवण्याच्या पावित्र्यात आहे .जैन समाजाच्या भारत बंदच्या घोषणेमुळे पर्यटन स्थळ होऊ नये म्हणून सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते .त्यामुळे जैन धर्मियांच्या धार्मिक भावनांचा विचार करता सम्यक शिखरजीचे पावित्र्य नेहमी अबाधित ठेवावे आणि याचे पर्यटन स्थळ बनवू नये या दृष्टिकोनातून सदर परिसराला सुरक्षा देऊन अनेक सुविधा द्याव्यात व हे तीर्थक्षेत्र घोषित करावे.
या तीनही प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सविस्तर चर्चा व योग्य ते पत्राद्वारे माहिती देण्यात आली असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली .
खासदार धैर्यशील माने यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. खासदार माने यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून पंतप्रधानांसोबत या महत्त्वपूर्ण प्रश्नांवरती सविस्तर चर्चा केली.