जिजाऊ आणि सावित्री यांच्या कार्याचा आदर्श घेऊन मुलींनी वाटचाल केल्यास सक्षम स्वावलंबी व धाडसी समाज निर्माण होईल- सुनंदा पाटील
शिराळा, प्रतिनिधी
जिजाऊ आणि सावित्री या महान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आजच्या मुलींनी वाटचाल केल्यास सक्षम स्वावलंबी आणि धाडशी समाज निर्माण होईल, त्यासाठी शालेय स्तरापासूनच विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आणि कार्याची समग्र ओळख होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले. त्या जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर आरळा येथे आयोजित जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा उपक्रमाअंतर्गत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित महिला शिक्षण दिन कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आरळा केंद्राच्या केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी, मुख्याध्यापक चंद्रकांत बेलवलकर, मुख्याध्यापक मोहन पवार, मारुती साळवी, अध्यक्षा नेत्रा झाडे, जितेंद्र परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुनंदा पाटील, केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी लताराणी पाटील, सुप्रिया घोरपडे, पुनम मसुटगे, शुभांगी भोसले, अस्मिता घोलपे,महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला, तसेच पणुंब्रे वारून केंद्रातील करुणा मोहिते, शैलजा तेली, शैला वारंग, या शिक्षिकांचा तसेच वारणावती केंद्रातील प्रीती वास्कर, सविता शिंदे मॅडम या सर्व कर्तबगार महिला शिक्षकांचा गौरव आरळा केंद्राच्या व सिद्धार्थनगर शाळेच्या वतीने करण्यात आला. तसेच विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल, सुधीर बंडगर, जितेंद्र लोकरे,नामदेव डाकोरे या शिक्षकांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शाळेच्या विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनी तसेच विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. शाळेत बाल सभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पवार यांनी केले तर आभार शिक्षिका लता राणी पाटील यांनी मानले.