देशातील जनतेला धर्माची अफूची गोळी देवून देशातील जनतेचे मुख्य प्रश्नांच्यावरून लक्ष विचलित करण्याचा डाव
इस्लामपूर दि.७ प्रतिनिधी
देशातील जनतेला धर्माची अफूची गोळी देवून देशातील जनतेचे मुख्य प्रश्नांच्यावरून लक्ष विचलित करण्याचा डाव खेळाला जात आहे. ही मानसिक,वैचारिक लढाई देशातील जनतेने शांतपणे समजून घ्यायला हवी,अशी भावना राज्याचे जलसंपदा मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली. राज्यात विजेची मागणी व निर्मितीमध्ये मोठी विषमता निर्माण झाली आहे. विजेचा तुटवडा कमी करण्यासाठी गावांनी,कुटुंबांनी सोलर संच बसवायला हवेत,अशी अपेक्षाही व्यक्त केली.
साखराळे येथील राष्ट्रवादी सेवादलच्या पाचव्या बैठकीमध्ये ते बोलत होते. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासा साठी’ या उपक्रमांतर्गत ही बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,माजी सभापती आनंदराव पाटील,माजी सभापती शैलेंद्र सुर्यवंशी सरपंच बाबुराव पाटील,उपसरपंच तजमुल चौगुले, महिला जिल्हा उपाध्यक्षा अलका माने प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ना.पाटील म्हणाले,केंद्र सरकारने कोळसा खाणी देताना जे निर्णय घेतले, त्यातून महाराष्ट्रासह सर्वच राज्यात कोळसा व वीज तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही राज्यातील विजेचा तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र गावा- गावांनी,प्रत्येक कुटुंबाने सोलर संच बसविण्यासाठी पुढे यायला हवे. सध्या सर्वत्र भोंगा हाच विषय वाजत आहे. मात्र यामुळे राज्यातील जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडत आहेत. धर्म ही अफूची गोळी आहे,असे कार्ल मार्क्सने सांगितले आहे. ती एकदा माणसाला दिली की,तो आपल्या घरातील प्रश्नही विसरून जातो. ही मानसिक,वैचारिक लढाई समजून घ्यावी. यावेळी ना.पाटील यांनी गावातील प्रश्नांवर चर्चा करून गावातील उर्वरीत विकासकामांना निधी देवू,अशी ग्वाही दिली.
माजी पं.स.सदस्य शिवाजी डांगे म्हणाले, केंद्र सरकार सर्वसामान्य माणसांच्या प्रश्ना वरून लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे पुढे करीत आहे. मात्र राज्यातील आता जनता फसणार नाही.
माजी उपसरपंच राजेंद्र पाटील म्हणाले, ना.जयंतराव पाटील यांनी साखराळे गावाच्या विकासाला गेल्या ५ वर्षात ९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
यावेळी साखराळेचे सरपंच बाबुराव पाटील यांनी गावातील विविध विकास कामांचा उल्लेख करीत निधीची मागणी केली.माजी सभापती शैलेंद्र सुर्यवंशी यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला. माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील,युवा कार्यकर्ते विनोद बाबर,अर्जुन वीरकर,अमोल पाटील,ऋतुराज धज, दिग्विजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी जेष्ठ नेते सुबराव डांगे,पाणी पुरवठ्याचे माजी अध्यक्ष भास्करराव पाटील, माजी सरपंच पी.बी.सुर्वे,सुर्यकांत पाटील, प्रताप पाटील,अर्जुन कचरे,वसंतराव माने, शंकरराव पाटील,आनंदराव दवणे,शशिकांत पाटील, जयकर पाटील,रामराजे पाटील,नारायण पाटील, बाबासो डांगे,प्रशांत पाटील,वसंत जाधव यांच्यासह गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच तजमुल चौगुले यांनी आभार मानले. रामभाऊ चिवटे यांनी सूत्रसंचालन केले.
राज्याचे मुख्यमंत्री पद,राज ठाकरे यांना टोला,आणि महिलांचे भाषण।।
दिग्विजय पाटील या युवकाने २०२४ साली राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल आणि…साहेब राज्याचे मुख्य मंत्री व्हावेत असे,म्हणणार,इतक्यात ना.पाटील यांनी एवढेच बस्स,एवढेच बस्स म्हणत त्यास रोखले. तेंव्हा एकच हशा झाला. याच कार्यकर्त्याने, भाजपच्या गल्लीतील कमळी च्या नादाला लागून कोण झालास तू,असा राज ठाकरे यांच्या काव्यात्मक टोला देताना ना.पाटील यांच्यासह सर्वांनी त्यास दाद दिली. ना.पाटील यांनी आपल्या भाषणात, महिलां ची भाषणे झाली नाहीत का? अशी विचारणा करीत पुढच्या बैठकीत महिलांच्या भाषणाने सुरुवात करूया,असे आवाहन केले.साखराळे येथील राष्ट्रवादी सेवादलाच्या पाचव्या बैठकीत बोलताना ना.जयंतराव पाटील. बाजूला विजयराव पाटील,आनंदराव पाटील,सुर्यकांत पाटील, अविनाश पाटील, बाबुराव पाटील,तजमुल चौगुले,अलका माने व मान्यवर.