किनरेवाडी पाझर तलावाच्या बांधकामास लवकरच सुरवात – रणधीर नाईक.
शिराळा प्रतिनिधी / किनरेवाडी पाझर तलावाच्या बांधकामास लवकरच सुरुवात होणार असून पाण्यापासून वंचित असलेल्या येथील शेतीला लवकरच शाश्वत पाणी मिळणार असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी व्यक्त केले.
काळम्मावाडी (किनरेवाडी) ता. शिराळा येथे काळम्मादेवी मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिन समारंभावेळी जाहीर सभेत ते बोलत होते. युवा नेते भूषण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रणधीर नाईक म्हणाले, शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळाले तर नागरिकांचा आर्थिक स्तर वाढण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील माजी मंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगराव नाईक हे या भागातील शेतीला शाश्वत पाणी मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. यातूनच किनरेवाडी पाझर तलावाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. परिसरातील नागरिक व शेतकरी पाझर तलावाच्या प्रतीक्षेत असून त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
नेतेमंडळींनी पाझर तलावाच्या कामासाठी सततचा केलेल्या पाठपुरावा यामुळे पाझर तलावाचे काम मार्गी लागले आहे. तालुक्यातील पाण्यापासून वंचित राहिलेले शेतीचे क्षेत्र यापुढील काळात शासन आपल्या खर्चाने पाण्याखाली आणण्यासाठी जलसंपदामंत्री व त्यांचे इतर सहकारी प्रयत्नशील आहेत. गेली ११ वर्षे काळमवाडी, किनरेवाडी व परिसरातील नागरिक राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून भक्तिभावाने काळम्मा देवीचा उत्सव गुण्यागोविंदानं साजरा करत आले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.
यावेळी भूषण नाईक, शिवाजी पाटील, बी. टी. किनरे यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक के. वाय. भाष्टे यांनी केले. महेश पाटील, बबन सोंडूलकर, मारुती पाटील, बी. पी. किनरे, बाबुराव पाटील, गणेश सोंडूलकर, सदाशिव नावडे यांच्यासह काळम्मादेवी सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.