एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व :एम. के.. पवार साहेब
माजी पोलिस निरीक्षक, भारतीय बौद्ध महासभा शाखा फणसवळेचे माजी अध्यक्ष, मौजे फणसवळे गावचे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष तसेच लहानथोरांचं आदर्शवत लाडके आणि मनमिळाऊ व्यक्तीमत्व दिवंगत मारुती काळू पवार ऊर्फ एम. के. यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. एक आदर्शवत पती, पिता, भाऊ, आजोबा, मामा, काका, आदर्श पोलीस अशा अनेक जबाबदार्या त्यांनी उत्तमरीत्या पार पाडल्या त्यांनी मौजे फणसवळे बौद्धवाडीतून पोलीस खात्यात सर्वप्रथम नोकरी करण्याचा मान मिळविला. रत्नागिरी पोलीस खात्यात रूजू झाल्यानंतर अल्पावधीतच साहेबांनी निस्वार्थीबुद्धीने काम करत आपल्या कामाचा ठसा उमटविला. पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, पोलीस सब इन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक म्हणून आपली जबाबदारी निस्वार्थीबुद्धीने उत्तमरीत्या पार पाडत सन – २०१० साली साहेब प्रदीर्घ सेवेनंतर पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. रत्नागिरी, खेड, चिपळूण, महाड शहर, महाड MIDC,पोलादपूर, मुंबई शहर अशा अनेक ठिकाणी साहेब कार्यरत होते. पोलीस खात्यात उच्च पदावर कार्यरत असताना पदाचा गैरवापर अथवा गर्व न करता निस्वार्थीपणे सेवा बजावत होते. पोलीस खात्यात काम करत असताना आपल्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाने साहेबांनी जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सच्चा दिलाचा माणूस म्हणून आजही त्यांची ओळख आहे. सेवानिवृत्तीनंतर साहेब आपल्या गावी फणसवळे येथे स्थायिक झाले.उर्वरित आयुष्य समाजासाठी आणि कुटुंबासाठी खर्ची घातले. भारतीय बौद्ध महासभा शाखा फणसवळेचे अध्यक्षपद, फणसवळे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्षपद भुषवत समाजाप्रती आपले योगदान दिले. *महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेप्रमाणे* आपला समाज एकसंघ राहिला पाहिजे ही शिकवण साहेबांनी समाजाला दिली. गावासाठी आपण काहीतरी काम केले पाहिजे. म्हणून सुलभा मारूती पवार या आपल्या पत्नीला त्यांनी ग्रामपंचायत फणसवळे येथे ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवडून आणले. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन सधन केले. वडिलांसमान त्यांनी सर्वाना माया दिली. सेवानिवृत्तीनंतर असे आयुष्य जगत असताना सप्टेंबर महिन्यात अचानक साहेबांची तब्येत बिघडली अन् त्यांना रत्नागिरी येथे हॉस्पिटलला अॅडमिट केले. ब्रेनस्ट्रोक झाल्याने चिरायू हॉस्पिटल रत्नागिरी येथे सर्जरी करण्यात आली. सर्जरीनंतर जवळपास दोन महिने साहेब हॉस्पिटलला होते. मात्र तब्येत कमी जास्त होत होती. असे होत असतानाच बुधवार दि. ०३/११ /२०२१ रोजी सकाळी ८.२५ वाजता साहेबांची प्राणज्योत मालवली. *एक आदर्शवत, मनमिळाऊ आणि समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व* समाजाला तसेच कुटुंबाला पोरके करून निघून गेले. *मरावे परि कीर्ती रूपे उरावे* याप्रमाणे प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव, पोलीस खात्यात केलेली निस्वार्थी सेवा, जनमानसातील ओळख आजही त्यांची कीर्ती दर्शवित आहे. साहेबांना आपल्यातून जाऊन दि. 03 नोव्हेंबर २०२२ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे, तरी त्यांना प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या *प्रेरणादायी व्यक्तीमत्वास आदराची आदरांजली व श्रद्धेची श्रद्धांजली
– – – आयु. एस्. के. जाधव सर