बाप हा माझा.. @ __डॉ.डी.एस.काटे
प्रत्येकाला आपल्या वडीलांच्या नावाबद्दल व कर्तृत्वाविषयी सांगावसं वाटतच..
कारण की आपल्याला बालपणी मिळालेल्या संस्काराची, मार्गदर्शनाची व ज्ञानाची त्यांच्याकडून मिळालेली शिदोरी आपण आयुष्यभर चाखत असतो…
मग कधी कधी बालपणीच्या आठवणीमधे आपण गहिवरून जातो..
*माझा बाप असा होता!!असे तोंडातून शब्द बाहेर पडतात !!*
वडीलाचे नाव हे तर प्रत्येक पुत्राला सागर प्रमाणे महान वाटते….
*तुका म्हणे सार •|*
*नाव जीवनाचे सागर•||*
माझ्या लहानपणीचा काळ मला आठवतो, त्याकाळी घडलेला वडिलांच्या जीवनातील किस्सा मला आयुष्यभर संयम आणि मार्गदर्शनपर वाटतो… तो घडलेला प्रसंग—
जेव्हा माझे वडील जुनी सातवी पास झाले’, त्यानंतर त्यांना काहींनी शेती करण्याचा सल्ला दिला..
वडील हे जन्मतःच प्लेग मुळे एका पायाने अधू असल्यामुळे त्यांना शेती जमणार नाही त्यासाठी त्यांनी नोकरीचा मार्ग पत्करावा असे आजोबांनी सांगितले !!
आमच्या आखेगाव या गावापासून साधारणपणे चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाडगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागले….
पण पाटीलकीचा बाणा असल्यामुळे, नोकरीवर जाण्यासाठी ते स्वतः बैलगाडी एक गडी किंवा घोडा घेऊन जात असत..
मग संध्याकाळी परत शाळा संपल्यानंतर येत असत..
पण एक दिवस अचानक शाळेतील तपासणीसाठी सरकारी अधिकारी आले. त्याकाळी सरकारी अधिकाऱ्यांचे निवासस्थान तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे शेवगाव येथे ,त्या गावापासून १६ किलोमीटर अंतरावर होते…
घोड्यावर बसून अधिकारी तपासणीसाठी तिथे आले ….
आल्यानंतर घोड्यावरून खाली उतरले व त्यांनी घोडे धरण्यासाठी त्याचा लगाम माझ्या वडिलांच्या हाती दिला…
एखाद्या अधिकार्याचे घोडे संभाळणे
हे काम त्यांना कमीपणाचे वाटले..!!
मनालाही खटकले ..!!
मग त्यांनी हातातील *घोड्याचा लगाम सोडून दिला आणि घोडं फरार!!!*
झाले घोडं फरार!!!
घोडे सांभाळणे हे काय माझे काम आहे का??
मी तुमचा नोकर आहे का??
मी शिपाई आहे का ???
असे प्रश्न करून त्यांनी अधिकाऱ्याला खडसावले व नंतर नोकरीवर पाणी सोडले ..आणि आजोबाला सांगितले की असे काम मी करणार नाही…..
नंतर तो अधिकारी सोळा किलोमीटर तालुक्याच्या ठिकाणी पायी गेला ..
अधिकाऱ्याने सर्व तालुकाभर फर्मान सोडले की माझे घोडं सापडून आणा.!!
चार दिवस घोडे सापडले नाही. ही सगळ्या तालुक्यात एकच चर्चा होती..
नोकरी गेल्यानंतर ही चूक वडिलांच्या लक्षात आली..
*नोकरी गेल्याची त्यांना खंत होती पण पश्चाताप केला नाही..*
आपल्या झालेल्या शिक्षणाला साजेल असं काम गावांमध्ये काय करता येईल??
यासाठी त्यांनी स्वतः गावामध्ये राहून सरकारी दरबारी आवश्यक लागणारी माहिती देणे.
सरकारी योजना व त्याची माहिती त्याचबरोबर फायदे-तोटे हे सर्व गावासमोर पोहोचवणे..
त्याचबरोबर गावातील सर्व सातबारा व सर्वे नंबर त्यांना तोंडपाठ होते..
कोणाला अर्ज लिहून देणे.
आखेगाव येथील पूर्ण शेत्र जमीन ३ हजार एकरचे मालक व त्याची झालेली हिस्सेवारी ,गट नंबर व क्षेत्रासहित पूर्णपणे त्यांना मुखगत होती…
प्रत्येक येणारा पाहुणा गावांमध्ये कोणत्या तारखेला येऊन गेला होता, त्याचबरोबर गावातील एखादे सामाजिक कार्य कोणत्या तारखेला झाले होती, हे त्यांना तोंडपाठ असे..
त्यांची स्मरणशक्ती अविस्मरणीय होती..
त्याकाळचे ते सेतू सुविधा केंद्रच ..
गावातील बहुतांश लोकांचे जन्मतारीख व त्याचबरोबर कोण कधी मृत्यू पावले हे सुद्धा त्यांना तोंडपाठ असे..
विशेष म्हणजे ह्या गोष्टी फक्त त्यांच्या स्मरणात असायच्या. कोठेही कोणती डायरी, वही यात नोंद नसे!!
महसूल खाते, न्यायालयीन खाते, त्याचबरोबर फौजदारी खाते येथे अनेक लोक त्यांच्याकडून सल्ला व कैफियत त्याचबरोबर अर्ज लिहून घेत असत..
न्यायाधीश सहित अनेक अधिकारी त्यांचे हस्ताक्षर लिहिण्याची शैली पाहून चकीत होत असे.
गावात येणारे टपाल त्याचबरोबर सरकारी आदेश आखाड्याच्या नोटिसा ह्या सर्व वाचून दाखवणे त्यावर मार्ग काढणे यामुळे निरक्षरासाठी मदत करणारा तो एक देव माणूस होता!!!
*कळवळा पोटी• |*
*सावधान हितासाठी* •||
*तुका म्हणे भाव•|*
*त्याचा तोचि जाणा देव•||*
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या हिताबरोबर तत्पर राहून, इतर बद्दलही ज्याच्या मनात कळवळा असतो तेच खरे देव…
पुढे पुढे त्यांचे एक निष्णांत सल्लागार म्हणून नाव प्रचलित होत गेले, त्यांनी दिलेला सल्ला व माहिती त्याचबरोबर कैफियत ही शंभर टक्के बरोबर असते हे सर्वांना
ज्ञात असल्याने..
अर्ज त्याचबरोबर विनंत्या, कैफियत यावर त्यांनी केलेला मथळा व मजकूर याला तोड नसे!!
कोणतीही व्यक्ती व अधिकारी हे सर्व वाचल्यानंतर पूर्णपणे एक सकारात्मक निर्णय त्या अर्जाच्या बाजूने देत असे..
त्यांच्याकडे गेलेल्या एकाही व्यक्तीला अपयश आल्याचे आठवत नाही …
कित्येकदा तर अनेक सरकारी अधिकारी,
मोठ मोठे व्यक्तिमत्व असणारे लोक त्यांच्याकडे स्वतःहून सल्ला घेण्यासाठी येत असे…
*पाटलाचा सल्ला घेतला तर काम फत्ते असी त्यावेळेस प्रत्येकाला प्रचीती येत असे….*
त्यांनी दिलेला सल्ला मला असा आहे की काम कोणतेही असो ते आपण स्वीकारणे !
तसेच जास्त अंहकार असू नये. !
त्याचबरोबर भावनेच्या भरात तातडीने कोणताही निर्णय न घेणे, संयमी राहणे..!
कोणासही कमी न लेखणं व उद्धट न वागणे..!
*आपल्या कर्तृत्वातून व कार्यातून सामाजिक भान ठेवून समाजाच्या ओझ्यातून ऋणमुक्त होणे हाच मानवाचा जगण्याचा मुल मंत्र असावा..!असे सल्ले दिले !!*
त्यामुळे मी आयुष्यभर त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा संयमाने वापर केला व व्यवसायामध्ये यशस्वी होण्यास कार्यतत्पर राहिलो…..