नेत्यांच्या आधीच्या कारकिर्दीची अवहेलना करणारी वक्तव्य करणं हे अशोभनीय आहे
माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. तसेच अलिकडेच माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.पण या दोन्ही नेत्यांच्यावर त्यांचा फार पूर्वीचा राजकारणात नसताना उपजीविकेचा
व्यवसाय म्हणजे रेल्वे स्टेशनवर चहा विक्रीचा होता. तसेच रिक्षाचालक म्हणून टीका होत आहे.हे चूकीचे आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेकदा मुलाखतीमधून हे स्पष्ट केलं आहे. हा व्यवसाय केल्याबद्दल त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही, खंत नाही. तसेच अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्यांनी शिवसेनेतून बंड केलं यानंतर त्यांच्यावर एक रिक्षावाला अशी टीकाटिप्पणी काही जणांनी करण्यात धान्यता मानली. स्वतः एकनाथ शिंदे यांनी आपण रिक्षा व्यवसाय केला हे कधीही नाकारलेलं नाही. आपण सचोटीच्या मार्गाने कोणताही व्यवसाय करणं गैर नाही.यात काय चुक आहे.कोणत्याही छोट्या-मोठ्या प्रामाणिक व्यवसायात असलेल्यांनी कधीतरी सत्तेतील मोठी पद मिळवावीत. मोठे उद्योजक व्हावं ही स्वप्न उराशी बाळगू नयेत का?कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करा, मोठे व्हा, कोणी काय करायच तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.मोदी-शिंदे यांच्यावर टीका करणार्यांनी आपण काय होतो आणि काय झालो आहोत किंवा आहे तिथेच राहिलो आहोत का? याचं आत्मपरीक्षण केलेलं बरं! कोणताही व्यवसाय छोटा-मोठा असू शकत नाही. कष्ट करताना लाजायचं का? उलट अभिमान असला पाहिजे. समाजातील इतर मंडळींनीही या वृत्तीचा स्वागतच केलं पाहिजे. आज हॉटेलमध्ये वेटर असो, घरोघर फिरून काही साधनसामुग्री विकणारे असो, अगदी अवैध धंद्यावरही अनेकांनी यापूर्वी काम केली. नंतर हा मार्ग बदलून चांगल्या मार्गावर आले आहेत. तसेच चांगले उद्योजक किंवा चांगले लोक नेते म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या आधीच्या कारकिर्दीची अवहेलना करणारी वक्तव्य करणं हे अशोभनीय आहे. उलट अशा छोट्या व्यवसायातून ही माणसं कष्टमय जीवन घेऊन पुढे आली आहेत. तेव्हा त्यांना कष्टकरी समाज व्यवस्थेचा अनुभव आहे. भविष्यात इतरांच्या वाट्याला आपल्या वाटेल आलेले दुःख येऊ नये या दृष्टीने ते निर्णय घेतील अशी अपेक्षा ठेवूया. एकनाथ शिंदेंचा उल्लेख शिवसेनेच्या त्यांच्या पूर्वीच्या नेते आणि मित्रांनी एकेरी केला. एक रिक्षावाला, एक दूध वाला, चहा वाला किंवा अंबानींसारखा उद्योजक मूलतः अगदी छोटा व्यवसायिकच होता. तो एकाच ठिकाणी राहिला नाही. परिस्थितीशी झगडला आणि मोठा झाला. कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक भाषणात स्वतः सोलापुरात केलेल्या कष्टमय जीवनाची माहिती सांगितली आहे. बुढी के बाल विकून त्यांनी दिवस काढले, शिक्षण घेतलं. यानंतर टप्प्याटप्प्याने यशस्वीतेकडे वाटचाल करीत राहिले. आज समाजात अशी हजारो उदाहरणे आहेत, प्रत्येकानं गरीब बिचारा बापडाच राहावं असं कशासाठी? माणसाने प्रगती केलीच पाहिजे. त्या प्रगतीची पोट दुखी इतरांना असू नये. दुसरी बाजू प्रगती करताना ती गैरमार्गाने केली आहे, अवैध संपत्ती जमवली आहे असं चित्र जर पुढे येत असेल तर ते कायदा विरोधी आहे. कायदेशीर मार्गाने त्यावर निश्चितच कडक कारवाई झाली पाहिजे. कष्टकर्यांना अवमानित करण्यात अर्थ नाही.आज अनेक यशस्वी गाथा आपण ऐकतो, वाचतो. एका रात्रीतून कोणी मोठा उद्योजक होत नसतो. त्याच्यामागे त्याचा त्याग, कष्ट , अभ्यास, हे नक्कीच असतं. गैरमार्गाने आलेलं मोठं पण फार काळ टिकत नाही. आपल्याला जे जमलं नाही ते समोरच्याने केलं ते मोठ्या मनानं कबूलही करायला हवं.ते मोठ्या मनाने मान्य करायला हवं.कायमस्वरूपी प्रत्येकांन आपल्या हाताखालीच काम करावं. आपल्या नेतृत्वात असावं त्यानं मोठं होऊच नये अशी मानसिकता बदलण्याची ही काळाची गरज आहे. आज आपल्या लोकशाहीमध्ये अनेक भ्रष्ट मार्गाने पुढे आलेल्यांची उदाहरणं आहेत.तसेच त्यांच्यावर कारवाई सुरू असताना खरोखरच कष्टमय मार्गाने पुढे येऊन समाजाचे नेतृत्व करत असल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. कायद्याने कारवाईस कोणी कोणाला रोखलेलं नाही. टिंगलटवाळी थांबवून चांगलं काय ते घेण्याचा प्रयत्न करावा.उगाच कोण होतास तू काय झालास तू हे गाणे गाऊन वेळ वाया घालवत बसू नये.शेवटी जो तो ज्याच्या त्याच्या नशिबानेच मोठा होतो.यात मुळीच शंका नाही.
लक्ष्मण राजे
मीरा रोड