सामाजिक न्याय खात्याच्या पुरस्कार वाटपाच्या कार्यक्रमाला मुहूर्त मिळेना
मुंबई- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात समाज कल्याणाचे उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांना थोर नेत्यांच्या नावाने विविध पुरस्कार दिले जातात.मात्र दोन वर्षाचा कोरोना काळ आणि गेल्या महिन्यातील राजकिय पेच प्रसंग यामुळे या पुरस्कार वाटपाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. मात्र आता नवीन सरकार सत्तेवर आल्यामुळे आता तरी या कार्यक्रमाला मुहूर्त मिळणार का असा सवाल अंतिम यादीतील पुरस्कारकर्ते करत आहेत.
दरवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि संस्थाना शाहू फुले आंबेडकर पारितोषिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार दिले जातात. यंदा हे पुरस्कार २६ जून रोजी राजश्री शाहू महाराज जयंती दिनी दिले जाणार होते.तसे परिपत्रकही काढले होते. मात्र अचानक राजकीय पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे हा कार्यक्रम स्थळ आणि पुरस्कारार्थीच्या प्रस्तावाची अंतिम यादी झाली असताना अचानक राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही.मात्र पुरस्कार मिळेल या आशेने राज्यभरातील अनेक संस्थाचालक, साहित्यिक,समाजसेवक आणि कलावंत मुंबईत दाखल झाले होते. त्याचा हिरमोड होऊन त्यांच्यात असंतोष निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया साहित्य मंचाचे संस्थापक अध्यक्ष अशोक रणदिवे यांनी दिली आहे.तसेच आता तरी १ ऑगस्ट रोजी होणार्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहाचे औचित्य साधून तरी हे पुरस्कार वाटप करावे अशी मागणी रणदिवे यांनी केली आहे.