महाविकास आघाडी शिक्षकांच्या पाठिशी ! – नाम.उदय सामंत * अध्यापक संघाचा विभागीय मेळावा उत्साहात * अध्यापक संघाच्यावतीने मागण्यांचे निवेदन सादर
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे राज्यातील शिक्षकांच्या पाठीशी असून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या रत्नागिरी,लांजा व राजापूर तालुका अध्यापक संघाच्या विभागीय वार्षिक मेळाव्यात बोलत होते.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ संलग्नित रत्नागिरी,लांजा व राजापूर तालुका अध्यापक संघाचा विभागीय मेळावा मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनि. कॉलेज पाली येथे नुकताच संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील होते. मंत्री उदय सामंत यांचा यावेळी संघटना व पाली हायस्कूलच्या वतीने जिल्हाध्यक्ष सागर पाटील व प्रचार्या प्रियदर्शनी रावराणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यातील व जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासमोर असणार्या ज्वलंत समस्या जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडल्या. या संदर्भात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडी सरकार शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.अध्यापक संघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनातील प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हास्तरावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत व राज्यस्तरावर शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासमवेत अध्यापक संघाची लवकरात लवकर बैठक आयोजित केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे कामकाज अत्यंत स्तुत्य असून जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ही संघटना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर अल्पसंख्याक संघटक इम्तियाज शेख ,वैदयकिय देयक या विषयावर राज्य प्रतिनिधी मंगेश जाधव, नवीन पेन्शन योजना या विषयावर जिल्हा सचिव रोहित जाधव व शाळा संहिता या विषयावर कायदेविषयक सल्लागार आत्माराम मेस्त्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भारत घुले ,संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार सदाशिव चावरे , जिल्हा उपाध्यक्ष गणपत शिर्के ,सुशांत कविस्कर ,कोषाध्यक्ष सर्जेराव करडे ,सल्लागार रामचंद्र महाडिक ,सी एस पाटील , संपर्क प्रमुख सचिन मिरगल , तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीशैल्य पुजारी ,सचिव विलास कोळेकर , मुख्याध्यापक अरुण जाधव , जिल्हा महिला संघटक सुनिता सावंत ,चिपळूण तालुका अध्यक्ष इम्तियाज इनामदार , संगमेश्वर तालुका अध्यक्ष सुनिल केसरकर , गुहागर तालुका अध्यक्ष दिलीप मानगावकर , चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण गोरे व रत्नागिरी ,लांजा व राजापूर तालुक्यातील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व तालुका संघटनेचे कार्यकारिणी सदस्य ,जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिपळूण,संगमेश्वर व गुहागर तालुक्यातील पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत राजापूर तालुका अध्यक्ष सुभाष सोकासने, लांजा तालुका सचिव संतोष मोहिते व रत्नागिरी तालुका अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अ.के. देसाई हायस्कूलच्या अध्यापिका अंजली पिलणकर व अध्यापक संतोष गार्डी यांनी केले. उपस्थितांचे आभार अध्यापक संदीप मयेकर यांनी मानले.विभागीय मेळावा यशस्वी करण्यासाठी मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सर्व अध्यापक व कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.
पाली हायस्कुलला पाच लाखाचा निधी.
यावेळी मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल ॲंड ज्युनि. कॉलज पाली प्रशालेस मंत्री उदय सामंत यांनी आमदार निधीतून पाच लाख रु चा निधी जाहिर केला.