वाटद खंडाळा दीक्षाभूमी बुद्ध विहारात उद्या बौद्ध धम्मगुरू भंते बुद्धपुत्र यांची धम्मदेसना
जाकादेवी/ वार्ताहर:-
रत्नागिरी तालुक्यातील वाटद- खंडाळा येथील बावीस खेडी बौद्धजन संघ यांच्या वतीने दीक्षाभूमी बुद्ध विहारात बौद्धांच्या वर्षावास या पवित्र कार्यक्रमाच्या सांगता समारंभ रविवार दि.९ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून यावेळी बौद्ध धम्मगुरू भंते बुद्धपुत्र यांचे विशेष प्रवचन होणार आहे.
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेच्यावतीने यावर्षी निर्बंध मुक्त वर्षावास अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी तालुका शाखेचे अभ्यासू व धडाडीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गाव शाखांमधून वर्षावास कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी तालुका शाखेच्या संस्कार समितीचे बौद्धाचार्य श्रामणेर संजय आयरे सुवेश चव्हाण, रविकांत पवार, संदीप जाधव यांनी प्रवचनकार म्हणून धम्म विषयक जनजागृती करून प्रवचन दिले. त्यातील वर्षावास कार्यक्रमाच्या प्रारंभ कार्यक्रम रत्नागिरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात घेण्यात आल्यानंतर घेण्यात गावशाखांमधील कार्यक्रम रत्नागिरी सडामिऱ्या, आनंदनगर,पानवळ,रत्नागिरी आंबेडकरवाडी, करबुडे येथे धार्मिक वातावरणात संपन्न झाले.
यावर्षातील संपूर्ण वर्षावास कार्यक्रमाची सांगता वाटद खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्धविहारात होणार आहे.
यावेळी रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांच्या समवेत उपाध्यक्ष विजय आयरे,चिटणीस सुहास कांबळे, धडाडीचे माजी अध्यक्ष तु. गो. सावंत आदींसह संस्कार समिती व विविध समित्यांचे पदाधिकारी तसेच गावशाखांचे पदाधिकारी, श्रामणेर ,बौद्धाचार्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी २२ खेडी बौद्धजन संघाचे धडाडीचे अध्यक्ष सुनिल उर्फ भाई जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख पदाधिकारी मेहनत घेत आहेत.