३७ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
यजमान रत्नागिरीचे दोन्ही संघ उपउपांत्यपूर्व फेरीत
क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर
रत्नागिरी १७, ऑक्टोबर (क्री. प्र.) : भारतीय खो खो महासंघाच्या व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व रत्नागिरी जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३७ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर करण्यात आले आहे. ३७ व्या राज्य किशोर-किशोरी खो-खो स्पर्धेत साखळीफेरीत यजमान रत्नागिरीच्या दोन्ही संघांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच पुणे, उस्मानबाद, सांगलीच्या संघांनीही विजयी घौडदौड सुरु ठेवली.
रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरु असलेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या दुसर्या दिवशी सकाळच्या सत्रात काही सामने चुरशीचे झाले. यजमान रत्नागिरीच्या किशोरी गटात बिड संघावर एक डाव २५ गुणांनी (२६-१) सहज मात केली. पहिल्या आक्रमणात रत्नागिरीने २६ खेळाडू बाद केले. तन्वी खानवीलकर व आरती पाष्टेने प्रत्येकी ४ तर मृदुला मोरेने ३ खेळाडू बाद केले. संरक्षणातही स्वरांजली कर्लेकरने (४:१० मि.), आर्या डोर्लेकरने (२:५० मि.) खेळ करत विजयात मोलाची भुमिका बजावली.
सोलापूरने नंदूरबारवर (१४-२) १ डाव १२ गुणांनी मात केली. विजयी संघातर्फे प्राजक्ता बनसोडे ४ मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. अश्विनी मांडवे २:३० मि. खेळ करत १ गुण तर कल्याणीने ३ गुण मिळवले. नंदुरबारतर्फे रोहीणी गावीतने १ मि व १:३० मि. खेळ केला. सांगलीने परभणीचा (१२-५) १ डाव ७ गुणांनी पराभव केला. त्यात धनश्री तामखेडेने ४:१० मि., समीक्षा शिंदेने २:३० मि. तर कृतिका अहिरने ३ गुण मिळवले. उस्मानाबाद संघाने लातूरचा तर नाशिकने पालघरचा पराभव केला.
किशोर गटातील सामन्यांमध्येही रत्नागिरीच्या संघाने नाशिकवर (२१-१३) ८ गुणांनी मात केली. विजयी संघातर्फे आशिष बालदेने २:४०, २:५० मि. संरक्षण करत ३ गुण मिळवले गडी, पार्थ बुदरने १:३० मि. आणि २:५० मि. खेळ केला. अथर्व गराटेने उत्कृष्ट आक्रमण करत ५ गुण वसूल केले. अहमदनगर संघाने मुंबई उपनगरचा (११-९) २ गुण आणि ३:२० मिनीटे राखुन पराभव केला. विजयी संघातर्फे प्रेम सिंहने २:३० मि. खेळ करत २ गुण मिळवले. इन्सान पावराने १:५०, १:४० मिनीटे खेळ केला तर जितेंद्र वळवीने ३ गुण मिळवले.
आज चुरशीच्या झालेल्या सामन्यात सांगलीने मुंबईचा (१३-१०) असा ३ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे संग्राम डोंबाळेने 2:20 मि. संरक्षण करत वेदांत इनामदारने २:२०, १:५० मि. खेळ करत सर्वाधिक ५ गडी टिपले. निहाल पंडितने ३:१०, १:२० मि. संरक्षण करत ३ गडी, विघ्नेश कोरेने १:३० मि. संरक्षण करत २ गडी बाद केले मात्र ते आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. उर्वरित सामन्यांमध्ये ठाणेने पालघरचा तर सोलापूरने जळगावचा पराभव केला.