महाराष्ट्रातील प्रत्येक माध्यमाच्या शालेय अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास शिकवायला हवा.
सुप्रसिद्ध साहित्यिका राजश्री बोहरा यांनी असे आवाहन अभ्यास मंडळाला आपल्या भाषणातून केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा , कल्याण डोंबिवली महानगर विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोजागिरी निमित्त निमंत्रित कवींच्या काव्यसंमेलन रविवार दिनांक १६/१०/२०२२ रोजी डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या लंबोदर सभगृहात आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक राजश्री बोहरा (अध्यक्षा मुंबई प्रदेश) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या भाषणातून त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. शालेय अभ्यासक्रमातून मराठी भाषेला प्राधान्य दिले जावे, घरा घरातून आपल्या मुलांशी पालकांनी जास्तीत जास्त मराठी भाषेतून बोलायला हवे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथा मुलांना शालेय अभ्यासक्रमातूनच शिकवायला हव्या. ज्ञानेश्वरीची ओळख, वाचन, पठण प्रत्येक मराठी घरातून झाले पाहिजे. असे तळमळीचे विचार बोहरा यांनी समाजापुढे मांडले.
या संमेलनाला कल्याण डोंबिवली महानगर च्या माझी महापौर सौ. विनिता विश्वनाथ राणे या विशेष मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी ही आपल्या भाषणातून उपस्थित कवी वर्गाला भारावून टाकले. अशा प्रेरणादायी मराठी संमेलनातून साहित्यिकांनी एकत्र येऊन समाजातील विविध पैलूंना आपल्या काव्यातून व्यक्त करायला हवे असे आवाहन महापौर राणे यांनी केले आहे. स्त्रियांसाठी व सहित्यीकांप्रती त्यांची तळमळ त्यांच्या भाषणातून व्यक्त झाली.
संमेलन अध्यक्षा सुप्रसिद्ध साहित्यिका अनिता गुजर यांनीही आपल्या मनोगतातून सासू सुनेच्या नात्यातील गोडवा कसा असावा हे व्यक्त केले.
स्वागताध्यक्ष पदी क. डो. महानगर विभागाचे अध्यक्ष श्री नवनाथ ठाकूर होते. त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने या संमेलनाचे उत्तम आयोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हरिश्चंद्र दळवी व श्री संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वनाथ राणे, तसेच फिल्म सेन्सॉर बोर्ड दिल्ली चे सदस्य श्री विलास खानोलकर हे मान्यवर देखील पूर्ण वेळ कार्यक्रमास उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवर कवींना त्यांच्या उपस्थितीमुळे प्रेरणा मिळाली.
या संमेलनासाठी मुंबई प्रदेश संगाठक श्री शशिकांत सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे इतर पदाधिकारी सदस्य
सौ. गीतांजली वाणी, श्री भारत घेरे, सौ. शोभा गायकवाड, श्री मुकुंद देवरे इत्यादी मान्यवर देखील पूर्ण वेळ कार्यक्रमास उपस्थिती होते.
क. डो. महानगर कार्यकारिणी श्री प्रतिक नागोळकर, सौ. स्मिता धुमाळ, सौ. उज्ज्वला लुकतुके, श्रीमती रतन याडकिकर, राजेंद्र पाटील, उदय क्षीरसागर, मंगेश म्हात्रे, जयंत पाटील यांच्या परिश्रमातून हे संमेलन साकार झाले. महानगरातील एकूण ५० कवींनी दर्जेदार काव्य सादरीकरण केले. कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काही उत्तम कवींना राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत, मनोगत, राज्यस्तरीय पुरस्कार वितरण, अल्पोपहार, निमंत्रीत कवींचे दर्जेदार काव्य संमेलन असा अद्वितीय कार्यक्रम साजरा झाला त्याची सांगता सामूहिक आणि सुरेल आवाजातील पसायदानाने करण्यात आली.
येणाऱ्या काळात असेच दर्जेदार संमेलनाचे आयोजन संपूर्ण मुंबई प्रदेश विभागातून करण्यात येणार आहेत अशी माहिती मु.प्र. अध्यक्षा राजश्री बोहरा यांनी दिली आहे.