कवलापूर विमानतळ हा १६० एकराचा भूखंड अबाधीतपणे शासनाच्या मालकीचाच राहिला पाहिजे -माजी जेष्ठमंत्री श्री . आण्णासाहेब डांगे
कवलापूर येथील विमान तळाची जागा कोन्या एका कंपनीला देण्याचा घाट घातला असल्याची बातमी वृत्तपत्रातुन आज वाचण्यात आली . त्याला भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी विरोध केला आहे . तसेच साखळकर यांनी या संभाव्य कंपनीला हि जागा मिळावी यासाठी चालविलेल्या उचापतींना विरोध दर्शवून प्लॉट पाडण्याचा पर्याय सुचविला आहे . या ही पर्यायाला आमचा सक्त विरोधच राहिल . अशा आशयाचे प्रसिध्दीपत्र महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . श्री . आण्णासाहेब डांगे यांनी प्रसिध्दीस दिले आहे .
दक्षीण महाराष्ट्रात होवू घातलेला नविन विमानतळ कोल्हापूर कागलचे दरम्यान निर्माण केलेल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहातीत व्हावा असे तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार मनोहर जोशी सरांची अपेक्षा होती . मी मात्र कवलापूरच्या अलीकडे असलेल्या संस्थानकालीन ज्याचा उल्लेख
” कवलापूरचा विमानतळ ” असा केला जातो तेथेच नविन विमानतळ होवून कवलापूरसह सांगली मिरजेच्या लौकिकात भर पडावी या दृष्टीने प्रयत्न करित होतो . स्व . विष्णूआण्णांनी कवलापूरच्या काही लोकांना हाताशी धरून विरोध केला . त्यामुळे पंचतारांकित एम . आय . डी . सी . ला जवळ पडेल व कोल्हापूरचा लौकिक वाढण्याच्या दृष्टीने युती शासनाने पावले उचलली .
स्व . वसंतराव दादांनी आष्टा – डिग्रज हे ज्वारीच्या धान्याच्या उत्पादनाचे कोठार समजले जाते . तेथे नविन असलेल्या हायब्रिड ज्वारीच्या पिकावरील कीड नियंत्रणासाठी आष्टा येथे तात्पुरता विमानतळ उभारला होता . तीन वर्ष किटक नाशकांची फवारणी केल्यानंतर तो विमान तळ रद्द करण्यात आला . सन १ ९ ७१ साली भारताचे पंतप्रधान मोरारजीभाई देसाई हे किर्लोस्कर कंपनीचे छोटे विमान घेवून सांगलीला आले तेव्हा त्यांचे विमान कवलापूरच्या विमानतळावरच उतरले होते . तसेच किर्लोस्करांना वारंवार किर्लोस्करवाडीहून पुणे – मुंबई वा अन्यत्र जायला लागते म्हणून त्यांनी स्वःताची धावपट्टी बनवून विमान उतरण्याची व्यवस्था लगतच्या पलूस कॉलनी म्हणून सद्या ओळखल्या जाणाऱ्या भागात केली होती . त्यांना ही आता छोटे विमान उतरण्यास जागा उरली नाही .
मी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जे स्वताः वैमानिक होते . तसेच विमानाची यंत्रे दुरूस्त करण्याचा प्रदिर्घ अनुभव होता त्यांनी शासकीय योजनेतून छोटी सहा विमाने खरेदी केली वा त्यांना मिळालेली होती . आसरकर नावाचे ते वयोवृध्द गृहस्थ आपल्या नातवाला घेवून माझ्याकडे आले व मला म्हणाले तुमच्या सांगलीला संस्थानकालीन जूना विमानतळ आहे . संस्थाने विलीन झाल्यामुळे ती जागा शासनाच्या मालकीची आहे तिचे सरकार दरमहा ठरविल तेवढे भाड्याने आपण घेवूया व तेथे वैमानिक ट्रेनिंग सेंटर काढूया म्हणजे तुमच्या भागातील अनेक मुले वैमानिक होतील विमान दुरूस्त करणारे मेकॅनिकल तयार होतील.
त्यांची हि योजना आम्हाला आवडली व तत्कालीन जिल्हाधिकारी नितीन करीर यांना भेटून ही योजना सांगीतली त्यांना हि ती पसंत पडली . मी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळाचे सदस्य शिराळाचे शिवाजीराव नाईक अशांनी मिळून कवलापूर विमान तळाच्या जागेवर वैमानिक ट्रेनिंग सेंटरचे भुमिपुजन केले . त्यास विरोध करण्याकरिता विष्णूआण्णांच्या पुढाकाराने कवलापूरातील काही लोकांना तुमच्या जमिनी जाणार आहेत असे भासवून त्यास विरोध करण्याच्या कारवाया चालु केल्या त्यापाहून आसरकरांनी असल्या भांडणात आम्हाला पढायचे नाही म्हणून ट्रेनिंग सेंटर काढण्याचा विचार सोडून दिला .
विज्ञानात जग झपाट्याने पुढे जात आहे . काही वर्षापूर्वी लग्न समारंभात फोटो काढणारे ड्रोन नावाचे यंत्र आपण कुतुहलाने पहात होतो . त्यात अधिक सुधारणा होवून ड्रोनच्या सहाय्याने शेतामधील विशेषतः ऊसाच्या उभ्या पिकांवर किडनाशके फवारण्याचा प्रयोग आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आम्हास दाखविला, आता उसाच्या पिकावर औषध फवारण्याचे साधन म्हणून सर्वत्र ड्रोनचा वापर चालु झाला आहे . काही दिवसात ड्रोनच्या सहाय्याने काही प्रमाणात हलक्या फुलक्या सामानाची या गावातुन दुसऱ्या गांवी ने आण करायला सुरूवात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही . आणि त्यापुढची पायरी म्हणजे हेलीकॉप्टर सारखी मनुष्य वाहतुक हि ड्रोनच्या सहाय्याने केली जाण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे .
भावी पिढ्यांच्या उज्वल भवितव्यांचा विचार करून अशा उपक्रमासाठी शासनाला आपल्या मालकिची एवढी मोठी जागा उपलब्ध झाली तर सांगली जिल्ह्याचे महत्व वाढेल व अनेकांना रोजगार निर्माण होईल म्हणून जनतेने या जागेच्या हस्तांतरणाला कडाडून विरोध केला पाहिजे या जागेचे मालक महाराष्ट्र शासनच राहिले पाहिजे , सरकारी मालकिचा उद्योग तेथे चालु झाला पाहिजे अशी आमची भावना आहे . कवलापूर येथील विमानतळाचा प्रस्ताव २०१५ मध्ये रद्द झाला आहे . असेही वाचनात आले . कुणी हा प्रस्ताव रद्द केला ? , का केला ? ते काय अजून आजूबाजूच्या लोकांना किंवा जिल्ह्यातील प्रमुख लोकांना सुध्दा माहिती नाही . हे सुध्दा काय गुपीत कारस्थान आहे कि काय हे सुध्दा तपासून पाहण्याची वेळ आली आहे . कोण कुणा खाजगी कंपनी अथवा गृह निर्माण संस्थांना जागा द्यायचा विचार करत असेल तर सांगली जिल्ह्याला अगदी मोक्याच्या ठिकाणी लाभलेला १६० एकराचा ठेवा अबाधीत रहावा यासाठी आंदोलन उभारावे लागले तर त्या दृष्टीनेही आम्ही सिध्द आहोत . असा इशारा महाराष्ट्राचे माजी जेष्ठमंत्री मा . श्री . आण्णासाहेब डांगे यांनी प्रसिध्द पत्राद्वारे दिला आहे .