पत्रकारिता सशक्त बनल्यास लोकशाही सशक्त होऊ शकते – आ. जयंत आजगावकर
शिराळा प्रतिनिधी
पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारांच्या पाठीशी सशक्तपणे उभी राहणारी एक व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येक समस्येला पत्रकार भिडतो परंतु पत्रकार ज्या वेळेला समस्येत येतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे उभे राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे पत्रकारिता खचत आहे. अशा अवस्थेत वारणा शिक्षण संकुलाच्या माध्यमातून डॉ. प्रताप पाटील यांनी पत्रकारांना प्रोत्साहित करण्याचे कार्य केले असल्याचे गौरव उद्गार खा. धैर्यशील माने यांनी काढले. वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य आ. जयंत आसगावकर हे होते तर प्रमुख पाहुणे आ. अरुण अण्णा लाड हे होते.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून वाळवा,शिराळा, पन्हाळा ,शाहूवाडी ,हातकणंगले या परिसरातील पत्रकारांचा सन्मान गेली बावीस वर्ष डॉ.प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारणा संकुलामध्ये केला जातो. दरवर्षी साहित्यप्राज्ञ स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने यावेळी दोन पत्रकारांना सन्मानित केले जाते. यावर्षी शिराळा येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी विकास शहा व कोडोली येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार बाबासाहेब कावळे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. जयंत आजगावकर म्हणाले, “वारणा शिक्षण संकुलामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून एक सशक्त पिढी घडवण्याची काम होत आहे. पत्रकार हा लोकशाहीला दिशा दाखवण्याचे काम करतो. ही पत्रकारिता सशक्त बनल्यास लोकशाही सुद्धा सशक्त होऊ शकते.” प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आ. अरुण लाड म्हणाले,” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहेत. तरुणांच्या मस्तकामध्ये लोकशाही बद्दल अस्ता निर्माण करणे हे विद्यालयातूनच घडत असते. सामाजिक जाणीव जपणारी पिढी निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित दोनशेहून अधिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी केले. यावेळी वारणा शिक्षण संस्थेचे सर्व विश्वस्त, पुरस्कार प्राप्त पत्रकार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी दिलीप पाटील,विकास शहा, बाबासाहेब कावळेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरज चौगुले व सुवर्णा आवटे यांनी केले तर आभार डॉ. प्रदीप कांबळे यांनी मानले.