आनंद – एक अनुभूती”…..डॉक्टर शाळीग्राम भंडारी
मानव जातीची किंबहुना सर्वच विश्वातील जीवजंतू प्राणी या सर्वांची धडपड ती आनंद प्राप्तीसाठीच चाललेली असते.
“आनंद – एक अनुभूती”
मानव जातीची किंबहुना सर्वच विश्वातील जीवजंतू प्राणी या सर्वांची धडपड ती आनंद प्राप्तीसाठीच चाललेली असते.
हे निर्विवाद सत्य आहे ,कुठे असतो हा आनंद?
आवाज न्यूज:तळेगाव दाभाडे २३ सप्टेंबर
विकत घेता येतो का? याच सोंग आणता येतं का? हा उत्तेजित असावा लागतो का? हा साधनेने, प्रयासाने आपण मिळवू शकतो का? असे अनेक प्रश्न आनंद या मनाच्या अवस्थेचा विचार करताना आपल्या समोर उभे राहतात. मी एखाद्या गोष्टीची अपेक्षा केली आणि ती मला सहजपणे किंवा अथक प्रयत्न आणि परिश्रम जेव्हा प्राप्त होते, त्यावेळच्या प्राप्तीचा आनंद होणं हे स्वाभाविक आहे.
याला अपवाद लहान मुलंसुद्धा नाही , ज्या लहान मुलांच्या बुध्दीचा अजूनही विकास झालेला नाही.
त्या निरागस निष्पाप वाटणाऱ्या मुलाला जर एखादी गोष्ट हवी असेल, एखादा पदार्थ हवा असेल आणि तो जर त्याला मिळाला तर सहाजिकच त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसंडून वाहताना आपल्याला दिसतो. हीच गोष्ट मोठ्या माणसाच्या बाबतीतही लागू पडते. वरील गोष्टीला अपवाद मात्र जे परम पदाला पोहोचले आहेत, *ज्यांना संतांचा सहवास घडलेला आहे तो नेहमी आनंदाच्या डोहात डुंबत असतो*. त्यामुळे तो कुठल्याही परिस्थिती वरती अवलंबून असतो, काही लोकांना संगतीतून आनंद निर्माण होतो. उदाहरणार्थ चांगले मित्र, चांगल्या मैत्रिणी, चांगले ग्रंथ, चांगली प्रेक्षणीय स्थळ, चांगला व्यवसाय, चांगला छंद ही त्या त्या व्यक्तीला निखळ आनंद देण्यास कारणीभूत होतात पण, आनंद काही लोकांना आपल्या व्यवसायातून सुद्धा मिळवता येतो.
ते तंबाखू सेवनाचे असेल, धूम्रपानाचे असेल, मद्यपानाचे असेल, जुगाराचे ही असू शकेल पण त्या आनंदाला समाजाची मान्यता तर सोडाच पण कुटुंबाची पण मान्यता मिळणार नाही, कारण असा आनंद विनाशाकडे नेणारा असतो, पण हा आनंद मिळवण्याकडे बऱ्याच लोकांचा कल असतो.
त्यांच्यापासून लांब राहणं यासाठी चांगल्या विचारांची दिशा देणारे, मोहापासून दूर ठेवणारे, नैतिकतेचे बंधने घालणारे असे आई-वडील, मित्र-मैत्रीण, गुरुजन वर्ग असावे लागतात आणि ते योग्य वेळी मिळणं आवश्यक असतं, कारण एकदा का तो व्यसनापासून मिळणाऱ्या आनंदाच्या आहारी गेला तर या भोवऱ्यातून बाहेर पडणं फार कठीण होऊन बसत.
आनंद ही एक मानसिक स्थिती आहे.
तो आपल्या जवळच असतो पण जवळ असूनही तो आपल्याला सापडत नाही हाच एक मोठा प्रश्न आहे.
स्वतःचा आनंद निर्माण करण्यासाठी इतरांना दुःखाच्या खाईत लोटणारे काही महाभाग असतात.
त्याला आपण असुरी आनंद म्हणतो.
साठे यांना पाच लाख रुपये लॉटरीचे तिकीट लागल ,आनंद होण सहाजिकच होतं पण, ज्यावेळी साठे पेक्षा जोशींना जास्त आनंद झालेला त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसला, त्यावेळी मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांच्या त्या आनंदाच्या संशयाचे निरसन करण्यासाठी मी त्यांना खोदून होऊन त्यांचे कारण विचारले, त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं ते खरोखरच एकसुरी आनंदाचे प्रतीक होतं. ते म्हणाले साठेंना जरी पाच लाखांचे लॉटरीचे तिकीट लागलं असलं तरीही त्यांना त्या लॉटरीचे तिकीट सापडत नाही,हे पाहूनच जोशींना आनंद होत होता. असा आनंद आपल्याला नको आहे.
आपल्याला मिळणारा आनंद आतुन असला पाहिजे, निर्भिड असला पाहिजे, आनंद मिळवण्यासाठी तसं मन आणि दृष्टी असली पाहिजे, आणि असं मन आणि दृष्टी असेल तर चराचरात भरलेला आनंद आपण अनुभवू शकतो, उपभोगू शकतो पण, त्या आनंदाचा पाया हा मजबूत असला पाहिजे.
*कोणाच्याही आत्म्याला न दुखावता प्राप्त झाला पाहिजे, आनंद हा चराचरात सामावलेला असतो फक्त तो शोधण्याची क्षमता एकदा का आपल्याला गवसली की तो प्राप्त होऊन सहज शक्य होतं*.
एका गृहस्थाने आपल्या मित्राला विचारले तुला संतांच्या ग्रंथाच्या संगतीत काय लाभ होतो.
मित्राने एका शब्दात उत्तर दिलं “आनंद”, पण या गृहस्थाने पुढे अजून तर्कशास्त्र लढवले, ज्याला, हे का चालवून चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणे म्हणतात., हा गृहस्थ म्हणाला ,मित्रा तुला ग्रंथांच्या संगतीत आनंद मिळतो, तर मला मद्याच्या संगतीत आनंद मिळतो, तुझा आनंद वाचनाचा, तर माझ्या प्राशनाचा, एकूण तुलाही आनंद नी मलाही आनंद! आपण दोघेही आनंदयात्रीच..!!। मित्राने या गृहस्थाला उत्तर दिले,
हे भल्या गृहस्था मद्याच्या संगतीत तुला जो आनंद मिळतो त्यात” आत्मनाश” आहे त्याला कुटुंबाची मान्यता नाही.
माझा आनंद चिरंतन आहे, त्यात पौर्णिमेच्या चांदण्याची शितलता आहे. तुला व्यसनापासून मिळणारा आनंद क्षणभंगुर आहे, त्यात अमावस्येच्या रात्रीची भीषणता आहे.
माझ्या आनंदात आनंद जन्माला येतो, तुझ्या आनंदातून उद्याचा विध्वंसही घडू शकतो?
आनंद एकच पण त्याची ही वेगवेगळी परिणामे आहेत.
आजचा विषय आपल्या पर्यंत पोहोचला असेल, शब्दांना विराम।।