उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले डॉ शं वा परांजपे यांचा आज 44 वा स्मृतिदिन .
डॉ शं वा परांजपे,या आदर्श ; व्यक्तिमत्वाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आवाज न्यूजच्या माध्यमातून.
उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले डॉ शं वा परांजपे यांचा आज 44 वा स्मृतिदिन .
आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, वार्ताहर,२४ नोव्हेंबर.
आम्हा तळेगांवकरांचे असे भाग्य की असे निष्णात फॅमिली डॉक्टर तर आम्हाला लाभलेच , पण सर्वांचे सांस्कृतिक आणि वैयक्तिक आयुष्य सुद्धा त्यांच्यामुळे समृद्ध झाले .
अनेकांना माहिती नसेल की तळेगांव येथील ऑर्डनन्स डेपोत नोकरी करून डॉक्टरांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते .डॉक्टरांकडे गेलेला रुग्ण त्यांचे हसतमुख आणि उमदे व्यक्तिमत्व पाहून आणि त्यांच्या आजारपणाची चौकशी ज्या पद्धतीने करीत त्यामुळे त्याचे 50 % दुखणे थांबत असे.
उत्तम हातगुण हे त्यांचे वैशिष्ट्य.
तळेगांव जवळच्या सुमारे 25 किमीच्या परिसरातील ग्रामीण भागात ते मोटारसायकलने जात . खराब रस्ते असल्याने पुढे 2 , 4 किमी पायी चालत जावे लागत असे . त्यामध्ये पैश्यापेक्षा सेवेचा भाव असे.त्यामुळे त्यांच्याशी हजारो कुटुंबे जोडली गेली . फी द्यायला पैसे नसले तरीही सर्वांचे उपचार त्यांनी केले .तरुणांशी मैत्रीच्या भावनेने बोलत असल्याने त्यांच्या वैयक्तिक समस्या ते डॉक्टरांना सांगत आणि त्यावर ते उपाय पण सांगत .अनेक तरुणांना त्यांनी नोकरी , व्यवसाय यासाठी मदत केली .हे सर्व करताना राजकारणातून समाजकारण करण्याचा आदर्श पायंडा त्यांनी सुरू केला .
त्यावेळच्या जनसंघाचे ते सक्रिय नेते आणि तळेगांव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष होते. मा अटलबिहारी वाजपेयी यांनी डॉक्टरांच्या घरी भेट दिली होती .
हे सर्व करीत असताना त्यांच्यातील चतुरस्त्र अभिनेता नाट्यचळवळीच्या रूपाने तळेगांवने अनुभवला.
1954 मधे तळेगावात त्यांनी हौशी नाट्यमंडळ सुरू केले . कलेची आवड असलेले अनेक तरुण त्यामुळे
एकत्र आले . आयुष्यात तोंडाला कधीही रंग न लावलेले हे कलाकार 3 अंकी नाटक सादर करू लागले तेही पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात .तळेगांवसारख्या त्यावेळच्या खेडे असलेल्या गावात हे सोपे नव्हते , पण डॉक्टरांची प्रचंड इच्छाशक्ती आणि कलेची आवड असल्याने हे शक्य झाले.
अशा नाटकाच्या प्रयोगातून स्नेहवर्धक संस्थेने सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेला बळ मिळाले . हॉटेल व्यावसायिक असो वा शिंपिकाम करणारा त्यांचे गुण ओळखून सर्वांना डॉक्टरांनी नाटकात काम करायला तयार केले.
1977 मधे कलापीनी या नावाने, गो. नी. दांडेकर. यांनी बारसे केलेली संस्था रजिस्टर झाली.
आप्पांचे शितू हे नाटक , भ्रमाचा भोपळा , साष्टांग नमस्कार , लग्नाची बेडी असे अनेक नाट्यप्रयोग हजारो रसिकांच्या प्रतिसादाने खुल्या नाट्यगृहात म्हणजे मैदानात सादर केले .
हे करीत असतानाच Telco कंपनीच्या गृहिणी या उपक्रमासाठी त्यांनी रहात्या बंगल्यावरील हॉल दिला , ज्यामुळे आणखी काही उपक्रम तळेगावात सुरू झाले .
हे सर्व जोमाने सुरू असताना 1978 मधे त्यांचे निधन झाले . संस्थेचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने गेली 45 वर्षे कलापीनीचा हा कलेचा वारसा सुरू आहे . त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ” आधी केलेची पाहिजे ” हा उपक्रम सुरू असून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या उपक्रमशील व्यक्तिमत्वाच्या मुलाखती या निमित्ताने होत असतात . यानिमित्ताने मनात येते.