ताज्या घडामोडी

मुलींच्या संगोपनाबरोबरच शिक्षण महत्वाचे-शिक्षणाधिकारी संगीता भागवत

Spread the love

पालघर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकी गुणगौरव

पालघर जिल्हा प्रतिनिधी
मुलींच्या संगोपनाबरोबरच त्यांचे शिक्षणही महत्वाचे असून पालघर जिल्ह्यातील एक ही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये याबाबत पालकांनी सुद्धा जागृत असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी केले.

क्रांतीज्योती प्रतिष्ठान पालघर आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सावित्रीच्या लेकी सन्मान सोहळा मंगळवारी (दि.०३ ) पंचायत समिती सभागृह पालघर येथे पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी संगीता भागवत होत्या. भागवत यांनी सांगितले की, शासनाने सुरू केलेल्या अहिल्याबाई होळकर योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, आदिवासी मुलींसाठी मानव विकास अंतर्गत येणाऱ्या योजना जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने प्रेरित होऊन आजही अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात प्रभावीपणे कार्यरत असल्याचा आपल्याला अभिमान आहे असे सांगून सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.

या सोहळ्याचे उद्घाटन पालघर पंचायत समितीच्या सभापती शैला कोलेकर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाले. सभापती कोलेकर यांनी सावित्रीबाई फुलेंमुळेच आज महिला विविध क्षेत्रात नावलौकिक कमावत आहेत, असे सांगून त्यांचे अभिनंदन केले.राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी प्रमोद पाटील यांनी सांगितले की,समाजात अनेक महिला उत्तम कार्य करत असून अशा महिलांचा शोध घेऊन त्यांचा गौरव केल्याने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्याने नक्कीच त्यांच्यामध्ये नवऊर्जा प्राप्त होते.

यावेळी क्रांतीज्योती प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश भोईर, सचिव संघमित्रा भोईर, पालघर- ठाणे माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका प्रगती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या अनिता वाढाण (पालघर), आश्लेषा माने (तारापूर), हेमलता ठाकूर (मनोर), नमिता राऊत (बोईसर), नूतन राऊत (केळवे), अश्विनी बिराजदार (वसई), आशा निकम (सफाळे), प्रज्ञा ठाकूर (पालघर(, शुभांगी पाटील (पालघर), संगीता चौधरी (डहाणू) तर उद्योग क्षेत्रातील कल्याणी बनसोडे, दर्शना पाटील (तारापूर), कृषी क्षेत्र हर्षाली माळी, व्यावसायिक क्षेत्र वैशाली डोहाळे, आरोग्य क्षेत्र कांचन ठाकरे, प्रमिला मानकर, पत्रकार विभागातून विभूती मिस्त्री, नीता चौरे या विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना सावित्रीच्या लेकी सन्मान देऊन गौरविण्यात आले. तर बालिका दिनानिमित्त पालघर येथील आर्यन हायस्कूलच्या मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीज्योती प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश भोईर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतिन कदम यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद चुरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!